कॅम्पात अतिक्रमणांवर कारवाई झालीच नाही
By Admin | Updated: June 23, 2015 03:23 IST2015-06-23T03:23:11+5:302015-06-23T03:23:11+5:30
शहरातील मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पात वाहतूक समस्या सोडविण्यासाठी धडक कारवाई करण्याचा निर्धार महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी

कॅम्पात अतिक्रमणांवर कारवाई झालीच नाही
पिंपरी : शहरातील मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पात वाहतूक समस्या सोडविण्यासाठी धडक कारवाई करण्याचा निर्धार महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी केला होता. चार दिवसांतच धडक मोहिमेची गर्जना पोकळ असल्याचे दिसून आले. वाहतूक पोलिसांनी नेहमीप्रमाणे काही वाहनांवर कारवाई करीत ठाणे गाठले.
पिंपरी बाजारपेठेत वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी कठोर कारवाईचे धोरण अवलंबण्याचा निर्धार महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी गेल्या बुधवारी (दि. १७) महापालिकेत झालेल्या बैठकीत केला होता. बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, महापालिका आयुक्त राजीव जाधव, उपायुक्त सारंग आवाड, सहायक आयुक्त महेंद्र रोकडे, बाजारपेठेतील व्यापारी आदी उपस्थित होते. वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करण्यात येणार होती. महापालिका प्रशासन या भागात फिरकले नाही. दिवसभरात एकही अतिक्रमण हटविले नाही.
वाहतूक पोलिसांतर्फे नेहमीप्रमाणे कारवाई केली जात होती. त्यात कठोर कारवाईचे धोरण दिसत नव्हते. इंदिरा गांधी उड्डाणपुलावर वाहतूक पोलिसांचे पथक सायंकाळच्या वेळेत उभे होते. विरुद्ध बाजूने पुलावर येणाऱ्या वाहनांना अडवून दंडाची पावती फाडली जात होती. बाजारपेठेत ‘नो पार्किंग’मध्ये लावलेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई केली गेली. काही चालकांकडून दंडात्मक पावती फाडण्यात आली, तर काही मोटारींना जॅमर लावण्यात आले. तासाभरानंतर ही कारवाई गुंडाळण्यात आली.
सायंकाळनंतर खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्यांनी काही रस्ते व्यापले होते. शगुन चौकातील रिक्षा स्टॅण्डवर बेशिस्तपणे रिक्षाचालक उभे होते. त्यांनी रस्त्याचा बराच भाग व्यापला होता.
जयहिंद हायस्कूल, एम. यू. महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय, महात्मा फुले महाविद्यालय, आर्य विद्यामंदिर, महापालिका शाळा आदी शाळा भरताना आणि सुटताना वाहतूककोंडीत भर पडत होती. सायंकाळच्या वेळेत विद्यार्थ्यांची आणि वाहनांची गर्दी नियंत्रित होत नसल्याने कोंडीत भर पडत होती.
(प्रतिनिधी)