कामे रखडलेली असताना नव्याने घोषणा
By Admin | Updated: April 29, 2017 03:59 IST2017-04-29T03:59:05+5:302017-04-29T03:59:05+5:30
गेल्या वर्षीचीच कामे मार्गी लागली नसताना, नव्या वर्षात १५ गावांसाठी योजना राबवण्याचे जाहीर करण्यासाठीच सारा प्रपंच केला होता

कामे रखडलेली असताना नव्याने घोषणा
इंदापूर : गेल्या वर्षीचीच कामे मार्गी लागली नसताना, नव्या वर्षात १५ गावांसाठी योजना राबवण्याचे जाहीर करण्यासाठीच सारा प्रपंच केला होता की काय, असे वाटावे, अशा पद्धतीने गुरुवारी (दि. २७) पंचायत समितीच्या सभागृहात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक पार पडली. शेवटची काही मिनिटे खासदार सुप्रिया सुळे यांनी या बैठकीस हजेरी लावली.
गेल्या वर्षी न्हावी, रुई, अकोले, भादलवाडी, पोंदवडी, मदनवाडी, शेटफळगढे,भरणेवाडी, शेळगाव, अंथुर्णे, बावडा, वकीलवस्ती, सुरवड, भोडणी व गोखळी ही पंधरा गावे जलयुक्त शिवार अभियानात निवडण्यात आली होती. शासकीय आकडेवारी नुसार प्रस्तावित आराखड्यात ३५७ कामांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी १६५ कामे पूर्ण, १९ कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले होते. या कामांवर १ कोटी ३५ लाख ४० हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. बैठकीच्या सुरुवातीला आमदार दत्तात्रय भरणे यांनी ज्या ठिकाणची कामे सुचवली जातील, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करुनच, कामांना मंजुरी द्यावी. भविष्यात त्या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानातील कामे करण्याची वेळ येऊ नये अशा पद्धतीचे दर्जेदार काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी गेल्या वर्षी या अभियानाच्या निमित्ताने अपेक्षित शिवार फेऱ्याच झाल्या नाहीत, ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. कामांचे आराखडे कार्यालयातच तयार करण्यात आले असावेत म्हणूनच यातील अनेक कामे अपूर्ण राहिली असावीत, असे सांगून पाणी फाउंडेशनचे काम उत्कृष्ट पद्धतीने सुरु आहे. जलयुक्त शिवाराच्या कामात पाणी फाउंडेशनला समाविष्ट करुन घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
प्रांताधिकारी हेमंत निकम म्हणाले, की बिलो टेंडरमुळे होणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत शंका निर्माण होत आहे. मे महिन्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या निमित्ताने शिवार फेऱ्या करण्यात येतील.
सर्वांना विश्वासात घेऊन ग्रामसभेतच या अभियानातील कामांना मंजुरी घेण्यात यावी. तलाव किंवा ओढ्याच्या बांधाला, जॅकवेलला धक्का न पोहोचू देता गाळ काढावा. तो शेतातच जाईल याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.(वार्ताहर)