फौजदारी वाद मिटविणे काळाची गरज : पाटील
By Admin | Updated: February 14, 2017 01:35 IST2017-02-14T01:35:24+5:302017-02-14T01:35:24+5:30
आपापसात बंधुत्वाची भावना ठेवून तडजोडीने व सामंजस्याने एकमेकांतील दिवाणी अथवा फौजदारी वाद मिटविणे काळाची गरज आहे.

फौजदारी वाद मिटविणे काळाची गरज : पाटील
मंचर : आपापसात बंधुत्वाची भावना ठेवून तडजोडीने व सामंजस्याने एकमेकांतील दिवाणी अथवा फौजदारी वाद मिटविणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर वित्तीय आणि शासकीय वादांचे निराकरण हे शक्य तेवढ्या प्रमाणात लवकरात लवकर निकाली निघाल्यास दीर्घकाळ होत राहणारे बौद्धिक, मानसिक व आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होईल, असे मत घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश एन. एन. पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय लोकअदालत घोडेगाव न्यायालयाच्या इमारतीत पार पडले. कार्यक्रमाप्रसंगी सहदिवाणी व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी बी. बी. चौहान, व्ही. आय. शेख यांसह वकील कार्यकारिणी सर्व विविध बँका, एमएसईबी, ग्रामपंचायत कार्यालयाचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. विधी सेवा समिती घोडेगाव आणि घोडेगाव न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने लोकअदालतीचा कार्यक्रम झाला. या वेळी गटविकास अधिकारी राहुल काळभोर, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. मुकुंद काळे, अॅड. संजय आर्विकर यांनी मार्गदर्शन केले.
लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी आणि दखलपूर्व प्रकरणांमध्ये ४५८ प्रकरणे निकाली निघाली. दखलपूर्व प्रकरणांमध्ये २८ लाख २२ हजार ९४५ रुपये इतक्या रकमेची वसुली झाल्याची माहिती देण्यात आली. अॅड. मंगेश कोकणे यांनी सूत्रसंचालन, तर अॅड. नवनाथ निघोट यांनी आभार मानले. (वार्ताहर)