नाझरेची पाणीक्षमता घटली
By Admin | Updated: May 9, 2017 03:35 IST2017-05-09T03:35:41+5:302017-05-09T03:35:41+5:30
नाझरे जलाशयातून तीर्थक्षेत्र जेजुरी आणि सुमारे ५० गावांना पिण्याचे पाणी; तसेच लाभक्षेत्रातील सुमारे ३१९५ हेक्टर शेतीच्या

नाझरेची पाणीक्षमता घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : नाझरे जलाशयातून तीर्थक्षेत्र जेजुरी आणि सुमारे ५० गावांना पिण्याचे पाणी; तसेच लाभक्षेत्रातील सुमारे ३१९५ हेक्टर शेतीच्या क्षेत्राला नियोजनातून पाणीपुरवठा केला जात आहे; मात्र जलाशयात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने सुमारे ५० दशलक्ष घनफुटाने पाणीसाठा कमी झालेला आहे. यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात या जलाशयावर अवलंबून असणाऱ्यांना पाणी योजना व शेती सिंचन योजनांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. जलाशयातील गाळ काढण्याची मागणी होत आहे.
१९७२च्या दुष्काळात जेजुरीनजीक पुरंदर व बारामती तालुक्यातील सुमारे ३१९५ हेक्टर शेत जमिनीच्या सिंचनासाठी व परिसरातील खेड्यांना पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी नाझरे जलाशयाची निर्मिती झाली. सुमारे ७८८ दशलक्ष घनफुट पाणीसाठा क्षमतेचे जलाशयात १९७४ पासून पाणीसाठा होऊ लागला. हे जलाशय कऱ्हा नदीवर बांधलेले असल्याने व जलाशयाचे पाणलोट क्षेत्र हे उथळ असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गाळ ही जलाशयात येत आहे. या साठलेल्या गाळामुळे जलाशयाचा पाणीसाठा कमी कमी होऊ लागला आहे. आजमितीला जलाशयात साधारपणे १० क्युबिक मीटर एवढा गाळ असू शकतो, असा अंदाज आहे. यामुळे जलाशयाच्या पाणीसाठ्यापैकी सुमारे ५० दशलक्ष घनफुट पाणीसाठा कमीच झालेला आहे. मध्यंतरी सन २०१२-१३ साली खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने महात्मा फुले जलसंधारण अभियानातून या जलाशयातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. लोकसहभागातून यावेळी सुमारे साडेचार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. यामुळे जलाशयातील पाणीसाठ्यात ही २० दशलक्ष घनफुटाने पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे.
सुमारे ७८८ दशलक्ष घनफुट पाणीसाठा क्षमता असणाऱ्या या जलाशयावरून जेजुरी शहर, जेजुरी औद्योगिक वसाहत, आय.एस.एम.टी. कंपनी, तसेच पुरंदर व बारामती तालुक्यातील ५० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून होत आहे. याशिवाय शेती सिंचनही मोठ्या प्रमाणावर होत असते.