नयना पुजारीला न्याय; इतरांचे काय?-
By Admin | Updated: May 9, 2017 04:09 IST2017-05-09T04:09:06+5:302017-05-09T04:09:06+5:30
सॉफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी हिच्या खुनाला तब्बल सात वर्षांनंतर न्याय मिळाला; पण इतर गुन्ह्यांचे काय? शहरात

नयना पुजारीला न्याय; इतरांचे काय?-
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सॉफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी हिच्या खुनाला तब्बल सात वर्षांनंतर न्याय मिळाला; पण इतर गुन्ह्यांचे काय? शहरात अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत. ज्यांचे खटले न्यायालयात उभेच काय पण त्यांचा तपासही अद्याप लागू शकलेला नाही. शहरात गाजलेले दर्शना टोंगारे खून प्रकरण तपासाअभावी सीआयडीकडे सुपूर्त करण्यात आले आहे; मात्र त्यांनाही या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले नाही. आशा लगड या ज्येष्ठ महिलेच्या खुनाचा तपास तर पुराव्याअभावी बंद करण्याची नामुष्की पोलिसांवर ओढवली, तर सुरेश अलूरकर यांच्या खुनास नऊ वर्षे उलटले तरी तपास निष्फळ ठरला आहे. मित्रमंडळ येथे हरी वासुदेव ढमढेरे यांचा २५ मार्च २०११, प्रल्हाद जोगदंडकर यांचा ४ मे २०१२ आणि मारुंजी येथे संगणक अभियंता वरुण सेठी यांचा झालेला खून या घटना तर रहस्यकथाच बनल्या आहेत.
दर्शना टोंगारे खून प्रकरण; सात वर्षांत प्रगती नाही
दर्शना देविदास टोंगारे या २१ वर्षांच्या हरहुन्नरी संगणक अभियंता मुलीची ३० जुलै २०१० ला निर्घृण हत्या करण्यात आली. मित्राने तिला दुचाकीवरून बावधन येथे सोडले आणि अंधाऱ्या पायवाटेने घरी निघालेल्या दर्शनावर अचानक हल्ला झाला. तिला चाकूने भोसकून हल्लेखोर पसार झाला. दर्शनाची किंकाळी ऐकून एका दुचाकीस्वारासह काही जण तेथे धावले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दर्शनाला जमलेल्या नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले; पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेला येत्या ३० जुलै रोजी सात वर्षे पूर्ण होतील. दर्शनाच्या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक गणपतराव माडगूळकर आणि त्यांच्या पथकाने अनेक प्रकारे प्रयत्न केले.
दर्शनाच्या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी दिवसरात्र तपास केला. एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्या सहा जणांची नार्को अॅनलिसिस करण्यात आली होती. मात्र, या चाचणीतदेखील काही निष्पन्न झाले नाही. शेवटी तांत्रिक तपासावर भर देण्यात आला. मात्र तपासात काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात आला. मात्र अद्यापही प्रगती शून्यच.
आशा लगड खून प्रकरणाचा तपास बंद
सदाशिव पेठेतील लक्ष्मी निवास इमारतीत चौथ्या मजल्यावरील सदनिकेत राहणाऱ्या आशा लगड या ज्येष्ठ महिलेचा रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास खून करण्यात आला होता. आशा लगड ३ जून २०१३ रोजी आळंदीला गेल्या होत्या. आळंदीहून त्या सायंकाळी घरी परतल्या. रात्री आठ वाजता त्यांचा खून झाला. त्यांच्या शेजाऱ्यांनी एकट्या राहणाऱ्या लगड यांच्या घरात पाहिले असता त्यांना त्या बेशुद्धावस्थेत कॉटवर पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती लगड यांच्या मुलाला दिली. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात ही माहिती कळविण्यात आली. एकटी राहणारी ज्येष्ठ महिला मृतावस्थेत सापडल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, तेव्हा कपाटातील रोकड व लगड यांच्या अंगावरचे दागिने असा २ लाख ८६ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे उघडकीस आले.
सुरुवातीला लगड यांचा खून हदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा संशय होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात लगड यांचा मृत्यू डोक्याला गंभीर इजा झाल्याचे स्पष्ट झाले. गजबजलेल्या सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचा खून झाल्याने पोलीसही हादरून गेले होते. प्राथमिक तपासात चोरीच्या उद्देशाने खून करण्यात आल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी फडतरे चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेल्या चित्रीकरणाची पडताळणी करण्यात आली. मात्र, तपासात पोलिसांना या शक्यतेला पुष्टी देणारे धागेदोरे सापडले नाहीत. इतरही शक्यता लक्षात घेऊन तपास करण्यात आला. मात्र काही उलगडा झाला नाही. तीन वर्षे हा तपास सुरू होता. अखेर या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. जून २0१७ रोजी खून प्रकरणाला चार वर्षे पूर्ण होतील.आरोपींचा शोध न लागल्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास बंद करण्याचा अहवाल न्यायालयाला सादर केला.
लोणावळयतील तरुण-तरुणीच्या खुनाचाही महिन्यानंतर नाही तपास
पुण्यातील तरुणाईचे पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात महाविद्यालयीन तरुण- तरुणीचा निघृण खून झाला. तब्बल महिना उलटला तरी या खुनाचा तपसा अद्याप लागलेला नाही. त्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड संताप आहे. याबाबत महाविद्यालयीन तरुणांनी मोर्चाही काढला होता. त्यामुळे शेवटी ग्रामीण पोलीसांनी या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण, ३ खासगी सायबर तज्ज्ञ, अशा गुन्हयांंचा तपास करण्यात तज्ज्ञ असलेले सध्या बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये नियुक्त असलेले अधिकारी अशा ५० जणांचा समावेश या पथकामध्ये करण्यात आला आहे.
सुरेश अलूरकर तपासात
पोलीस निष्फळ
कर्वे रोडवरील अलूरकर म्युझिक हाऊसचे मालक, संगीताचे जाणकार आणि जुन्या संगीताचे संग्राहक सुरेश अलूरकर यांचा खून १४ डिसेंबर २00८ ला झाला होता. मात्र नऊ वर्षांनंतरही पोलिसांना या मारेकऱ्यांना पकडण्यात यश आलेले नाही.
अलूरकर हे कर्वे रोडवरील स्वप्ननगरी सोसायटीत एकटेच राहत होते. या सोसायटीसमोरच त्यांचे दुकान होते. आरोपीने अलूरकर यांचे हातपाय बांधून चाकूने त्यांच्यावर वार केले होते. दोन दिवस त्यांचे दुकान बंद असल्याने त्यांचे एक मित्र त्यांना पाहण्यास घरी गेले होते. त्या वेळी खुनाचा प्रकार उघड झाला होता.
डेक्कन पोलीस तसेच गुन्हे शाखेने या गुन्ह्याच्या तपासासाठी प्रयत्न केले. मात्र, अलूरकर यांच्या मालमत्तेचाही पोलिसांनी अभ्यास केला. मालमत्तेच्या कारणासह विविध दृष्टीने तपास करण्यात आला. तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी या गुन्ह्याबाबत माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. मात्र, पोलिसांचे सर्वच प्रयत्न निष्फळ ठरले. नऊ वर्षे उलटली तरी खनाचा उलगडा झालेला नाही.