खेडमध्ये राष्ट्रवादीचा अस्तित्वासाठी संघर्ष

By Admin | Updated: January 23, 2017 02:37 IST2017-01-23T02:37:07+5:302017-01-23T02:37:07+5:30

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे खेड तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत

National struggle for existence of NCP in Khed | खेडमध्ये राष्ट्रवादीचा अस्तित्वासाठी संघर्ष

खेडमध्ये राष्ट्रवादीचा अस्तित्वासाठी संघर्ष

राजगुरुनगर : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे खेड तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समितीची सत्ता राखणार की शिवसेनेकडून त्यांच्या वर्चस्वाला धक्का बसणार, या संघर्षामध्ये काँग्रेस आणि भाजपाचा किती फायदा होणार याची चर्चा तालुक्यामध्ये रंगली आहे. पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जमाती महिलावर्गासाठी राखीव झाल्याने रेटवडी व पिंपरी बुद्रुक या दोन गणांवर सर्वच पक्षांचे लक्ष केंद्रित होणार आहे.
खेड तालुका हा स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला आणि त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा तालुका ओळखला जातो. सलग वीस वर्षे स्व. नारायणराव पवार यांनी आणि नंतर दहा वर्षे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे तालुक्यातील राजकारणावर वर्चस्व राहिले. त्यामुळे काही वर्षांचा अपवाद वगळता त्यांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ताब्यात पंचायत समिती होती. सध्याही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पर्यायाने मोहिते समर्थकांचे पंचायत समितीवर बहुमत आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश गोरे, शिवसेनेचे आमदार झाल्यानंतर खेड तालुक्यामध्ये शिवसेनेचे बळ वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र बाजार समिती, जिल्हा बँकेवर मोहितेंनी पकड कायम ठेवली. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये गोरे आणि मोहिते यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर भाजपाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांचेही भाजपाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरूआहेत. आळंदी नगरपरिषद जिंकल्यामुळे त्यांच्या आशा वाढल्या आहेत.
गेल्या पंचवार्षिकामध्ये चार पंचायत समिती सदस्य व एक जिल्हा परिषद सदस्य असलेल्या काँग्रेसलाही विजयाच्या अपेक्षा आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्ये तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सात सदस्यांपैकी सहा सदस्य राष्ट्रवादीचे तर एक सदस्य काँग्रेसचा होता. तर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे सात, काँग्रेसचे चार, शिवसेना, भाजपा व अपक्ष प्रत्येकी एक असे १४ सदस्य होते. मोहिते यांनी भाजपा सदस्याच्या मदतीने राष्ट्रवादीची सत्ता स्थापन केली होती. पुढे काँग्रेसच्या राजेश जवळेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर जिल्हा परिषद सदस्य असलेले सुरेश गोरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर आमदार झाले. त्यानंतर त्यांच्या गटात त्यांनी शिवसेनेचे किरण मांजरेंना निवडून आणले आणि गटातील आपले वर्चस्व सिद्ध केले. येत्या निवडणुकीसाठी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सात जागांपैकी एक जागा सर्वसाधारण, दोन जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, दोन जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, एक जागा अनुसूचित जमाती, एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या आकांक्षावर पाणी फिरले असले तरी वाशेरे-नायफड, सांडभोरवाडी-काळूस आणि पाईट-पिंपरी बुद्रुक या तीन गटांमध्ये चुरस वाढली आहे. पंचायत समितीच्या चौदा गणांपैकी तीन सर्वसाधारण, चार सर्वसाधारण स्त्री, दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग, दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, एक अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमाती व एक अनुसूचित जमाती स्त्री वर्गासाठी राखीव आहेत. सभापतिपद अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव आल्याने रेटवडी गण या प्रवर्गासाठी राखीव असून या गणाला महत्त्व आले आहे.
सध्या शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा आणि काँग्रेस या सर्वच पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोहितेविरोधकांची संख्या कमी झाल्याने सर्व जागांवरील उमेदवार मोहिते सांगतील तेच उमेदवार पक्षश्रेष्ठी देतील, असा मोहिते समर्थकांचा दावा आहे. जिल्ह्यामध्ये भाजपा-शिवसेना युती होईल, असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले तरी खेड तालुक्यात शिवसेनेने सर्वच जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन स्वतंत्र लढण्याचीच रणनीती आखली आहे. त्यामुळे युतीची शक्यता धूसर आहे. शिवसेना उमेदवारांच्या यादीवर खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार सुरेश गोरे यांच्या शिफारस महत्त्वाची ठरणार की काही जागांबाबत जुन्या निष्ठावंतांचे पक्षश्रेष्ठी ऐकतील याबाबत उत्सुकता आहे. काही गट व गणांमध्ये प्रबळ उमेदवार देण्यासाठी गोरे यांनी राष्ट्रवादीतून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत आणले आहेत. परंतु त्या ठिकाणी निष्ठावंत आणि बाहेरून आलेले यांच्यामध्ये उमेदवारीसाठी संघर्ष होण्याची शक्यता आहे. युती न झाल्यास स्वतंत्रपणे लढण्यासाठी भाजपाकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पिंपरी बुद्रुक-पाईट आणि वाशेरे-नायफड या दोन गटांवर भाजपाने जास्त लक्ष केंद्रित केले असून, चऱ्होली खुर्द-कुरुळी व नाणेकरवाडी-महाळुंगे या औद्योगिक पट्ट्यातील गट व गणांमध्येही भाजपाचे उमेदवार डार्क हॉर्स होऊ शकतील, असा कार्यकर्त्यांचा दावा आहे. काँग्रेसही स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरणार असून, या पक्षाकडूनही मातब्बर उमेदवार रिंगणात उतरू शकतात.(वार्ताहर)

Web Title: National struggle for existence of NCP in Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.