‘नटखट’मधून आयुष्याचा खजिना मांडला
By Admin | Updated: January 22, 2015 23:31 IST2015-01-22T23:31:32+5:302015-01-22T23:31:32+5:30
आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले. जे अनुभवले ते लिहिले आहे. माझ्या आयुष्यातील आठवणींचा खजिना ‘नटखट’मधून वाचकांसमोर मांडला आहे.

‘नटखट’मधून आयुष्याचा खजिना मांडला
पुणे : आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले. जे अनुभवले ते लिहिले आहे. माझ्या आयुष्यातील आठवणींचा खजिना ‘नटखट’मधून वाचकांसमोर मांडला आहे. लिखाणात प्रांजळपणा, पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, असे ज्येष्ठ अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले.
जोशी यांनी बुधवारी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट देऊन संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. प्रसिद्ध सूत्रसंचालक राजेश दामले या वेळी उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले.
जयंत बेंद्रे यांनी शब्दांकन केलेल्या ‘नटखट’ या त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्राबाबत त्यांनी दिलखुलासपणे संवाद साधला. ‘नटखट’चे संपूर्ण श्रेय पत्नी आणि मित्र जयंत बेंद्रे यांचे आहे. त्यांनीच ही कल्पना मांडली. मला बोलते केले. त्यातून ९० मिनिटांच्या तब्बल ६५ कॅसेट झाल्या. केवळ वर्णन होऊ नये म्हणून ‘कादंबरी’च्या फॉर्ममध्ये लिखाण केले. तब्बल पाच वेळा पुनर्लेखन केले. ‘नटखट’ला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पहिली आवृत्ती संपली आहे, असे जोशी यांनी सांगितले.
विनोदापासून ते व्हिलनपर्यंत रंगविलेल्या मराठी- हिंदी चित्रपटातील भूमिकांबाबत विचारले असता जोशी म्हणाले, ‘‘आजपर्यंत ३७५ हून अधिक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. चित्रपट मराठी असो की हिंदी, तुमची गरज भासणे महत्त्वाचे आहे.
ही गरज निर्माण करण्यात मला यश मिळाले. कोणत्याही भाषेतील चित्रपट करताना त्या भाषेचे सखोल ज्ञान आणि भाषेवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक असते. ते एकदा जमले की काही अडचण येत नाही. त्याचबरोबर कष्टही महत्त्वाचे असतात.
‘ऐलान’ चित्रपटात मी एका मुस्लिमाची भूमिका साकारली होती. मुस्लिम सहकलाकाराकडून मी बोलीभाषा अवगत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी, त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारायचो, त्यांच्याबरोबर जेवायला बसायचो. त्यामुळे, आपोआपच त्यांच्याशी दोस्ती झाली आणि नकळत सेल्फ मार्केटिंगही.’
गाण्याच्या छंदाबाबत बोलताना जोशी म्हणाले, ‘‘मला पहिल्यापासूनच गाण्याची
आवड आहे. राग वगैरे कळत नसले तरी माझ्या डोक्यात सूर पक्के
आहेत. त्यामुळे चांगले गाणे आणि वाईट गाणे यातील नेमका
फरक कळतो. ‘पैज लग्नाची’, ‘बे
दुणे साडेचार’ या चित्रपटांची शीर्षकगीते गायली असल्याचे त्यांनी
नमूद केले.’’
बालनाट्य चळवळीत एके काळी अग्रणी असलेले जोशी म्हणाले, ‘‘पूर्वी लहान मुलांना नीलमपरी, हिमगौरी, बुटका राक्षस अशा
प्रकारची नाटके भावायची.
सध्याच्या पिढीची मानसिकता मात्र पूर्णपणे बदलली आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात लहान मुलांच्या गरजा आणि आवडीही बदलल्या आहेत.’’ (प्रतिनिधी)
४नाट्यपरिषदेच्या नवीन संकल्पांबद्दल बोलताना मोहन जोशी म्हणाले की, आम्हाला जादा एफएसआय मंजूर झाला आहे.
४नाट्यरिषदेच्या मुंबईतील इमारतीत तालमींचे दोन हॉल, वाचनालय, वसतिगृह इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बांधकाम करायचे आहे. त्यासाठी ३-४ कोटी खर्चाची तरतूद आहे. त्या दृष्टीने आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत.
४बेळगाव येथे होणारे यंदाचे नाट्यसंमेलन हे रंगतदार करून नव्या पिढीला त्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करणार आहे.
४यंदाच्या नाट्यसंमेलनात ८ नाटके व एका संगीत नाटकाचा समावेश आहे. तरुण पिढीतील शास्त्रीय गायकही या नाट्यसंमेलनात सामील होतील. सगळ्या अडचणींवर मात करून यंदाचे नाट्यसंमेलन रंगेल, यात शंका नाही.
४टोलचा प्रश्नही नाट्यसंमेलनाच्या दरम्यान सुटेल.
एका नटाचे पुस्तक असल्याने ‘नटखट’चा प्रकाशन समारंभही पारंपरिक होऊ नये, असा प्रयत्न केल्याचे राजेश दामले यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘प्रकाशन समारंभाच्या प्रारंभी मोहन जोशींचे मोंताज तयार करण्यात आले. त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेल्या ‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया’ या गाण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटनांच्या चित्रफिती, चित्रपटातील दृश्ये यांचा वापर करण्यात आला. मोहन जोशींच्या आजूबाजूच्या व्यक्तींना त्यांच्याबद्दल काय वाटते, याबद्दल त्यांना बोलते करून त्या चित्रफितींचाही समावेश करण्यात आला. पुस्तकाची ४ फुटांची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्याचे अनावरण पुण्यात जब्बार पटेल आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्या हस्ते करण्यात आले. ‘जीना यहा, मरना यहा’ या मोहन जोशींच्याच आवाजातील
गाण्याने अनोख्या प्रकाशन समारंभाची सांगता झाली.’ लता मंगेशकर यांनी पत्र लिहून या गाण्याबद्दल मोहन जोशींचे कौतुक केल्याचेही दामले यांनी सांगितले.