नाशकातली निओ मेट्रो पुण्यातही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST2021-01-08T04:28:08+5:302021-01-08T04:28:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नाशिक शहरात महामेट्रोकडून साकारत असलेल्या निओ मेट्रो या प्रकल्पाचा पुण्यातही वापर होण्याची शक्यता आहे. ...

नाशकातली निओ मेट्रो पुण्यातही?
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नाशिक शहरात महामेट्रोकडून साकारत असलेल्या निओ मेट्रो या प्रकल्पाचा पुण्यातही वापर होण्याची शक्यता आहे. स्वारगेट ते कात्रज या मार्गासाठी हा विचार सुरू आहे. खर्च कमी असल्यामुळे याचा विचार सुरू असून प्रस्ताव आल्यास त्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची महामेट्रो कंपनीची तयारी आहे.
महामेट्रोचे व्यवस्थाकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनीच याचे सुतोवाच केले. नाशिकमधील निओ मेट्रोचा प्रकल्प अहवाल महामेट्रोने तयार केला. तो राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. केंद्र सरकारने या अहवालाचा एक पथदर्शी प्रकल्प (मॉडेल) म्हणून विचार केला आणि अन्य काही शहरातही या प्रकारची सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत विचार सुरू केला. महामेट्रोसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
पुण्यात निओ मेट्रोचा विचार आहे का या प्रश्नावर डॉ. दीक्षित म्हणाले की असा विचार कोणत्याही शहरात होऊ शकतो. आमचे काम प्रकल्प अहवाल तयार करण्याचे, त्याला केंद्र व राज्य सरकारची संमती मिळाल्यानंतर तो राबवण्याचे आहे. निओ मेट्रोचा खर्च नेहमीच्या मेट्रोपेक्षा अतिशय कमी आहे. प्रत्येक प्रकल्पाच्या मर्यादा असतात. साधारण बस ५५ प्रवाशांना घेऊन धावते. त्यापेक्षा जास्त गर्दी असेल तर बीआरटीची विचार करतात. साधारण २० हजारांच्या आसपास प्रवासी असतील तर मेट्रोचा विचार होतो. यामधील म्हणजे १० ते १५ हजार प्रवासी असतील तर निओ मेट्रोचा विचार केला जातो.
कात्रज-स्वारगेट या मार्गावर निओ होऊ शकते का, या प्रश्नावर डॉ. दीक्षित म्हणाले, “आम्हाला या मार्गाचा अभ्यास करण्यास महापालिकेने सांगितले होते. या मार्गावर उन्नत मार्ग होऊ शकत नाही, असे निदर्शनास आल्याने भुयारी मार्गाच्या प्रकल्प अहवालासाठी महापालिकेने निधी दिला. तो अहवाल तयार करून दिला. आता निओसाठी प्रकल्प अहवाल करायचा तर तशी मागणी त्यांच्याकडून यायला हवी.
निओ योग्य की भुयारी मार्ग यासंदर्भात डॉ. दीक्षित यांनी भाष्य केले नाही. शिवाजीनगर ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग भुयारी आहे. तोच मार्ग भुयारी म्हणूनच पुढे कात्रजपर्यंत नेण्याची मागणी आहे. या मार्गावरील बीआरटी त्रासदायक असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या नव्या योजनेचा विचार वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्याला पक्का दुजोरा मिळू शकला नाही.