पुणे: महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्यास जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला व त्याच्या सहकाऱ्याला महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी चांगलाच दणका दिला आहे. या पदाधिकाऱ्याला व त्याच्या साथीदारांना महापालिका भवन व महापालिकेशी संलग्न मिळकतींमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
भाजपच्या कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी १७ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या आरोग्य विभागात जमावाने येऊन महिला अधिकाऱ्यांचे चित्रीकरण करून दमदाटी केली. तसेच त्यांना कार्यालयाच्या बाहेर जाण्यास मज्जाव केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संबंधित महिला अधिकाऱ्याने सुरक्षा विभागासह भाजपच्या नेत्यांकडे कदम यांची तक्रार केली होती. तसेच महापालिकेच्या अंतर्गत तक्रार समितीकडेही तक्रार केली होती. त्यानंतरही कदम यांच्याकडून त्रास देणे सुरूच होते. त्यामुळे संबंधित महिला अधिकाऱ्याने थेट राज्य महिला आयोगाकडेच तक्रार केली. याशिवाय कदम यांच्या विरोधात महापालिकेच्या सुरक्षा विभागानेही पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे.
नवनियुक्त महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून महिला अधिकाऱ्यास त्रास दिल्याबद्दल अंतर्गत तक्रार समितीच्या अहवालानुसार ओंकार कदम, अक्षय कांबळे यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांना महापालिका भवन व महापालिकेशी संलग्न मिळकतींमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नवलकिशोर राम यांनी काढले आहेत. कदम व त्यांच्या साथीदारांनी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
स्पष्टीकरणाच्या पत्रकार परिषदेत भंबेरी उडाली
महिला अधिकाऱ्याने महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर ओंकार कदम, अक्षय कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. माहिती अधिकारात माहिती न दिल्याने बदली होईल या भीतीने आरोप केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. तसेच शहरी गरीब विभागात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत यापूर्वी या विभागाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याने चांगले काम केले. त्यांनी या विभागातील भ्रष्टाचाराचे रॅकेट तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडूनच हा विभाग काढून घेण्यात आल्याचे नमूद केले. दरम्यान, यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर त्यांना योग्य उत्तरे देता आली नाहीत. प्रश्नांमुळे भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले.
या प्रश्नांची उत्तरेच देता आली नाहीत...
राज्यात सत्ता आहे, असे असताना आपल्या नेत्यांच्या कानावर महापालिकेतील भ्रष्टाचार का घातला नाही, इतर वरिष्ठ अधिकारी असताना एकाच महिला अधिकाऱ्याला लक्ष्य का केले जात आहे, बिलांवर अंतिम सही करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव का घेतले जात नाही, सात वर्षांपासून विभागात भ्रष्टाचार होत आहे, तर मग यापूर्वी जबाबदारी असणारे अधिकारी चांगले काम करत होते, हे कसे म्हणता. जमाव घेऊन महापालिकेत येताना तुम्ही पोलिसांची परवानगी घेतली का? या प्रशांची उत्तरे कदम व त्यांच्या सहकाऱ्यांना देता आली नाहीत.