अपघातानंतर ५ तास मुंबई-बंगळुरू महामार्ग थांबला
By Admin | Updated: June 12, 2015 06:13 IST2015-06-12T06:13:55+5:302015-06-12T06:13:55+5:30
भरधाव डंपरने दहा ते बारा वाहनांना दिलेल्या धडकेने, झालेल्या भीषण अपघातामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. र

अपघातानंतर ५ तास मुंबई-बंगळुरू महामार्ग थांबला
पुणे : भरधाव डंपरने दहा ते बारा वाहनांना दिलेल्या धडकेने, झालेल्या भीषण अपघातामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला साधारणपणे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल पाच तास झालेल्या वाहतूककोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले होते. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी मुंबईकडून-बंगळुरूला जाणाऱ्या बाजूने एकपदरी वाहतूक सुरूकरून दिली होती.
वडगाव पुलाजवळ सकाळी साधारणपणे आठच्या सुमारास डंपरचा अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस घटनास्थळी धावले. दरम्यान, अग्निशमन दलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. वाहतूककोंडी झाल्यामुळे अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रासह कात्रज आणि सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्रावरील वाहने पोहोचण्यास उशीर लागला. विरुद्ध बाजूने (नो-एंट्री) वाहने घालून; तसेच छोट्या दुभाजकांवरून चालवत ही वाहने घटनास्थळापर्यंत नेण्यात आली.
मुंबईकडून येणारी वाहतूक एक पदरी करुन दुसऱ्या बाजूने मुंबईकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली होती. दरम्यान, अपघातामुळे रस्त्यावर तुटून पडलेली झाडेही तत्काळ बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. मदतकार्य सुरू असताना सेवा रस्त्यावरचीही वाहतूक बंद केल्यामुळे महामार्गावरील कोंडीमध्ये आणखी भर पडली होती.