बीआरटीसाठी आॅगस्टचा मुहूर्त
By Admin | Updated: July 3, 2015 00:32 IST2015-07-03T00:32:43+5:302015-07-03T00:32:43+5:30
औंध-रावेत बीआरटीएस प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. एक आॅगस्टपासून ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असेन, अशी माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बीआरटीसाठी आॅगस्टचा मुहूर्त
पिंपरी : औंध-रावेत बीआरटीएस प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. एक आॅगस्टपासून ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असेन, अशी माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनेक एजन्सी एकाच मार्गावर काम करीत असल्याने कामास विलंब होत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. अनेक वेळा तारीख पे तारीख करूनही याबाबत हतबल असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले.
केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत सार्वजनिक वाहतूक सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने बीआरटीएस प्रकल्पाची घोषणा २००७मध्ये केली होती. त्यानंतर २००९ला त्याविषयीची कार्यवाही सुरू झाली होती. निगडी-पुणे हा मार्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा या मार्गाऐवजी रावेत-औंध हा मार्ग अगोदर सुरू करू, असे नियोजन करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून बीआरटी उद्घाटनाचे नियोजन केले जात होते. मात्र, तीन ते चार वेळा मुहूर्त बदलण्यात आले. महिनाभरापूर्वी १६ जुलै हा मुहूर्त काढण्यात आला. तोही मुहूर्त गाठू शकणार नसल्याचे दिसून येते. महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात असणारा समन्वयाचा अभाव यामुळे याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारच्या हॅलो पिंपरी-चिंचवडमध्ये प्रकाशित केले होते. बीआरटीला मुहूर्त सापडणार कधी? असा प्रश्न उपस्थित केला होता. आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयीचा खुलासा केला. (प्रतिनिधी)
बीआरटीबाबत आयुक्त हतबल
बीआरटीला मुहूर्त कधी लागणार, याविषयी आयुक्तांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, ‘‘रावेत-औंध हा मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या कामासाठी वेगवेगळ्या एजन्सी काम करीत आहेत. बसथांबे, टर्मिनलचे काम झाले आहे, टेक्निकल कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे विलंब होत आहे. पूर्वी महिन्यांनी उद्घाटन होईल, असे आम्ही सांगत होतो. ते आता दिवसांवर आले आहे. १६ जुलै तारीख समोर आहे. मात्र, अधिक वेळ लागला, तर एक आॅगस्टपासून हा मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न असेन. त्यानंतर दुसरा मार्ग सुरू होईल.’’ या विधानावरून आयुक्त हतबल असल्याचे दिसून येते.