एम.एस्सीच्या प्रश्नपत्रिका एक तास उशीरा
By Admin | Updated: May 7, 2014 00:48 IST2014-05-06T22:07:25+5:302014-05-07T00:48:42+5:30
पुणे विद्यापीठाच्या एम.एस्सी. विषयाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना तब्बल एक तासाने उशिरा मिळाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा.

एम.एस्सीच्या प्रश्नपत्रिका एक तास उशीरा
पुणे : पुणे विद्यापीठाच्या एम.एस्सी. विषयाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना तब्बल एक तासाने उशिरा मिळाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे काम अजूनही गोंधळाच्या वातावरणातच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात सकाळ आणि दुपारच्या सत्रात एम.एस्सी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. मात्र इलेक्ट्रानिक्स, गणित आदी विद्याशाखांनिहाय विषयांच्या परीक्षा होत्या. प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात अर्धा तास उशिराने देण्यात आल्या. तसेच दुपारच्या सत्रात पाऊण तास उशिरांनी प्रश्नपत्रिका मिळाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व काही येत असताना, व्यवस्थित उत्तरे लिहू न शकल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. वाडिया, पूना कॉलेज आणि फर्ग्युसनसह अन्य महाविद्यालयात हाच प्रकार घडला.
एम.एस्सीच्या अंतिम वर्षाच्या महत्त्वाच्या परीक्षा होत्या. या परीक्षेवरच पुढील शैक्षणिक भवितव्य अवंलबून असते. मात्र, उशिराच प्रश्नपत्रिका मिळाल्याने परीक्षेची उत्तरे लिहिण्याची मानसिक स्थिती राहिली नाही. त्यामुळेे पेपर व्यवस्थित सोडविता आले नसल्याचे वाडिया कॉलेजमधील एका विद्याथ्याने सांगितले. या सर्व प्रकाराला विद्यापीठाचा परीक्षा विभागाच जबाबदार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्याशी संपर्क साधले असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही. विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. के. सी. मोहिते यांनी मात्र माझ्यापयंर्त अशी काही तक्रार आली नसल्याचे सांगितले.
---------
व्यवस्थापन परिषदेत परीक्षा नियंत्रकांविषयी चर्चा
पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन परिषदेची बैठक मंगळवारी झाली. मात्र, कोणत्याही धोरणात्मक विषयांवर ठोस निर्णय घेण्यात आला नाही. निलंबित परीक्षा नियंत्रक संपदा जोशी यांच्याविषयी चर्चा झाली. कुलगुरूंनी या कारवाईबाबतचा तपशिल सदस्यांपुढे मांडला. याबाबत संपदा जोशी यांनी कोर्टात विद्यापीठाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाला आहे, त्यामुळे चर्चा आवरती घेण्यात आली.