एमपीएससीने प्रतीक्षायादी जाहीर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST2021-09-02T04:23:55+5:302021-09-02T04:23:55+5:30
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध पदांच्या परीक्षांच्या अंतिम निकालाबरोबरच उमेदवारांची प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात यावी, ...

एमपीएससीने प्रतीक्षायादी जाहीर करण्याची मागणी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध पदांच्या परीक्षांच्या अंतिम निकालाबरोबरच उमेदवारांची प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. प्रामुख्याने वनसेवा मुख्य परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी या विभागासाठी तत्काळ प्रतीक्षायादी लावण्याची मागणी केली आहे. ही यादी लावल्याने अनेकांना नोकरीची संधी मिळू शकते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
शासनाची आर्थिक टंचाई, कोविड १९, निवडणुका आणि आरक्षणाचे मुद्दे आदी कारणांमुळे पदभरती प्रक्रिया वेळेत पार पडत नाही. तसेच ही प्रक्रिया पूर्ण होण्यास व उमेदवारांना नियुक्त्या मिळण्यास विविध कारणांमुळे दोन ते तीन वर्षांचा कालावधी जात आहे. विद्यार्थ्यांना कोणतेही पद मिळाले असले तरी इतर विभागाच्या परीक्षा देता येतात. ते पदावर रुजू होतातच असे होत नाही. त्यामुळे ते पद रिक्तच राहते. रिक्त पद पुढील परीक्षेसाठीच्या पदांमध्ये समाविष्ट करण्यात येते. मात्र, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत आहे, त्यांना जागा रिक्त राहूनही पद मिळत नाही. यामुळे प्रत्येक परीक्षेच्या निकालानंतर प्रतीक्षा यादी जाहीर करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
प्रत्येक परीक्षेनंतर प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचा निर्णय आयोगाने २०१४ मध्ये घेतला होता. त्यानुसार एक वर्ष प्रतीक्षा यादी जाहीर करण्याची तरतूद करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
--------------------
राज्यसेवा, अभियांत्रिकी, वनसेवा, कृषीसेवा परीक्षा प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचे धोरण राबविण्याबाबत प्रस्ताव ठेवला आहे. हे धोरण राबविल्यास उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.
- दयानंद मेश्राम, एमपीएससी सदस्य. (ट्विटरवरील प्रतिक्रिया)
चौकट
वनसेवा परीक्षा २०१९ अंतर्गत १०० जागा भरल्या जाणार आहेत. मुलाखतीला पात्र ठरलेल्या ३२२ उमेदवारांपैकी ५२ उमेदवार हे आधीच राज्य सेवेतून मिळालेल्या विविध पदांवर रुजू आहेत. विविध कारणांमुळे वनसेवेत निवड झालेले उमेदवार वनसेवेपेक्षा राज्य सेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, शिक्षण अधिकारी आदी पदांच्या नोकरीस प्राधान्य देतात. यापैकी मुलाखत देऊन प्रत्यक्ष निवड होणाऱ्या उमेदवारांपैकी किती जण वन सेवेच्या नोकरीवर रुजू होतील हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी जर लावण्यात आली तर नक्कीच इतर उमेदवारांना संधी मिळेल
- शिवाजी टोम्पे, परीक्षार्थी
वनसेवा देणाऱ्या उमेदवारांचे म्हणणे :
-वनसेवा २०१७ अंतर्गत निवड झालेल्या एकूण ४३ अधिकाऱ्यांपैकी १४ उमेदवारांना ‘राज्यसेवा’मधून पोस्ट मिळाली.
-वनसेवा २०१८ अंतर्गत निवड झालेल्या एकूण ६९ वनसेवा अधिकाऱ्यांपैकी ७ पेक्षा जास्त उमेदवारांना ‘राज्यसेवा’मधून पोस्ट मिळाली.
-वनसेवा २०१९ अंतर्गत निवड होणाऱ्या एकूण १०० वनसेवा अधिकाऱ्यांपैकी १० पेक्षा जास्त उमेदवारांची आधीच राज्यसेवा परीक्षा २०१८, २०१९ मधून मोठ्या पदावर निवड झाली आहे.
-राज्यसेवा परीक्षा २०२० मधून निवड होईल आणि ते वनसेवा सोडून इतर पदांवर रुजू होण्याची शक्यता आहे.
- दर वर्षी वनसेवेत निवड झालेल्या उमेदवारांपैकी किमान १० टक्के पेक्षा जास्त उमेदवार वनसेवा सोडून अन्य सेवेत दाखल होतात, असे दिसून येते.