विद्येच्या माहेरघरात सर्वाधिक शालाबाह्य मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:37+5:302021-02-05T05:11:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या जिल्ह्यात हक्काचे असलेले प्राथमिक शिक्षणही मुलांना घेता येत नसल्याचा प्रकार जिल्हा ...

विद्येच्या माहेरघरात सर्वाधिक शालाबाह्य मुले
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या जिल्ह्यात हक्काचे असलेले प्राथमिक शिक्षणही मुलांना घेता येत नसल्याचा प्रकार जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात उघड झाला आहे. जवळपास ३ हजारांहून अधिक मुले शाळेतच दाखल नसल्याचे यात उघड झाले आहे. यात सर्वाधिक संख्या शिरूर आणि मुळशी तालुक्यात आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेल्याने मोठ्या प्रमाणात बालकामगार म्हणून राबत असल्याचीही मोठी शक्यता आहे.
कोरोना काळात लागलेल्या संचारबंदीमुळे, तसेच अनेक शाळा बंद असल्यामुळे गरीब तसेच वंचित घटकातील मुलांना शिक्षण घेता आले नाही. ऑनलाईन शिक्षण सुरू असले, तरी परिस्थिती नसल्याने विद्यार्थी लाभापासून वंचित राहिले. आज जिल्ह्यातील ५ वी ते ८ वी आणि ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात शाळेत न येणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण शिक्षण विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. सुरूवातीला २८ तारखेपर्यंत हे सर्वेक्षण संपवण्याचे आदेश होते. मात्र, या सर्वेक्षणाला आता मुदत वाढ देण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत या सर्वेक्षणात तीन हजारांहून अधिक मुले शालाबाह्य असल्याचे आढळले आहे. शिरूर आणि मुळशी तालुक्यातील विद्यार्थी शालाबाह्य झाले आहेत. कष्टकरी आणि ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना हक्काचे शिक्षण मिळावे या हेतून सर्वेक्षण सुरू आहे. ३ ते १८ वयोगटातील मुले शिक्षण घेत आहेत की नाही, हे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन तपासण्यात येत आहेत. जवळपास ११ हजार शिक्षक आणि ८ हजार अंगणवाडी सेविकांमर्फेत हे सर्वेक्षण सुरू आहे.
आतापर्यंत ३ लाख ८८ हजार ९०२ कुटुंबांची घरोघरी जाऊन पाहणी करण्यात आली आहे. यात ० ते १८ वयोगटांतील ५ लाख ७८ बालके आढळली. यात ३ ते ६ वयोगटांतील ३ हजार ३४४ विद्यार्थ्यांची शाळेतच नोंदणी नसल्याचे आढळले. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, घरोघरी हे सर्वेक्षण सुरू आहे. याद्वारे अशा शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे. कोरोनामुळे अनेक मुले बालकामगार म्हणून कामे करत असल्याची भीती आहे. अशा प्रकारच्या क्षेत्राची आखणी करण्यात आली असून त्या ठिकाणी पाहणी करून त्यांच्या पालकांना मुलांना शाळेत पाठवण्यासाठी सांगितले जाणार आहे.
चौकट
या सर्वेक्षणात ४ लाख ८४ हजार ४५९कुटुंबांची तपासणी करण्यात आली. यासाठी ११ हजार शिक्षक आाणि ८ हजार अंगणवाडी सेविका या कार्यरत आहेत. ० ते १८ वयोगटांचे पाच भाग पाडण्यात आले असून त्या नुसार हे मुलांची पाहणी करण्यात येत आहे. प्रत्येक घरी तसेच वाड्या वस्ता आणि पालावर जाऊन मुलांची माहिती घेतली जात आहे.
चौकट
शिरूर, मुळशी हॉट स्पॉट
जिल्ह्यात सर्वाधिक शालाबाह्य मुले ही शिरूर आणि मुळशी तालुक्यात आढळली आहे. जवळपास १५०० हजार मुले मुळशी तालुक्यात, तर २ हजार मुले ही शिरूर तालुक्यात शालाबाह्य असल्याचे आढळले. पुण्यासारख्या जिल्ह्यात शाळेत न जाणाऱ्या मुलांचे हे प्रमाण धक्कादायक आहे.
कोट
प्राथमिक शिक्षण हा सर्व मुलांचा हक्क आहे. तो मुलांना मिळावा या हेतूने हे सर्वेक्षण सुरू आहे. सुरुवातीला हे सर्वेक्षण २८ तारखेपर्यंत करण्यात येणार होते. मात्र, याला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. या सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी
कोट
पालकांचे मन वळवून मुलांना देणार शिक्षण
सर्वेक्षण संपल्यावर शिक्षकांना प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर पाठवले जाणार आहे. ज्या ठिकाणी शालाबाह्य मुले आढळली आहेत, त्यांच्या पालकांना भेटून मुलांना शाळेत पाठवण्यासाठी त्यांचे मतपरिवर्तन केले जाणार आहे.
- विजय शिवतरे, उपाध्यक्ष
चौकट
४ लाख ८४ हजार ४५९ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण
- २२ लाख ३७ हजार ३०३ कुटुंब सदस्यांची संख्या
-० ते १८ वयोगटातील एकूण ६ लाख २२ हजार ५४६ मुले
- ३ ते ६ वयोगटातील जवळपास ३ हजार ३४४ मुलांची अद्यापही शाळेत नावे नाहीत.