गोंधळी समाजावरच ओढवलेय अरिष्ट
By Admin | Updated: February 5, 2015 00:17 IST2015-02-05T00:17:43+5:302015-02-05T00:17:43+5:30
मखमलीचे अंगरखे, गळ्यात कवड्यांचा माळा आणि डोक्यावर कंगणीदार पगडी घालून गोंधळी जेव्हा ‘आई उदे गं अंबे उदे’ असा गजर करतात त्या वेळी वातावरणात एक चैतन्य निर्माण होते.

गोंधळी समाजावरच ओढवलेय अरिष्ट
पुणे : मखमलीचे अंगरखे, गळ्यात कवड्यांचा माळा आणि डोक्यावर कंगणीदार पगडी घालून गोंधळी जेव्हा ‘आई उदे गं अंबे उदे’ असा गजर करतात त्या वेळी वातावरणात एक चैतन्य निर्माण होते. आई अंबेचा गजर करुन भक्तांच्या संकटांचे निवारण कर, असे साकडे हे गोंधळी देवादिकांना घालतात. देवीचा गोंधळ घालणाऱ्यांमध्ये इतर समाजातील लोकांची घुसखोरी झाल्याने हा समाज अडचणीत आला आहे.
या गोंधळी समाजाचे मूळ काम ‘गोंधळ घालणे’ हे आहे. त्याला जगदंबेचा गोंधळ किंवा देवीचा गोंधळ असे म्हणतात. घरात शुभकार्य झाले म्हणजे, लग्न, मुंज, बारसे यासारखे कार्य झाले की देवीचा गोंधळ घालण्याची प्रथा आहे. घरावर आलेले अरिष्ट दूर व्हावे, या भावनेपोटीही कित्येक भाविक हा विधी करतात. महाराष्ट्रात गोंधळाला फार महत्त्व आहे. महाराष्ट्राप्रमाणेच बेळगाव भागातही गोंधळ घातला जातो.
गोंधळ म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेप्रमाणे एक पूजा असते. गोंधळ घालणाऱ्या समाजाला पिढीजात वारसा आहे. गोंधळी हा जन्मजातच या विधीचा वारसा घेऊन येतो, असे म्हणतात.
राक्षसाचे प्राबल्य वाढले, अधर्म माजला म्हणून ३३ कोटी देवांपुढे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी गोंधळ घातला होता. अधर्म माजला की गोंधळ्याने माझं स्तवन करावे, प्रार्थना करावी, अधर्मांचे पारिपत्य करण्यासाठी मी अवतार घेईन, असे जगदंबेने सांगितले. तेव्हापासून कलियुगात प्रतिकात्मक गोंधळ हा धार्मिक विधी रूढ झाला. पहिला गोंधळ परशुराने घातला होता, अशी आख्यायिका आहे.
ज्यांच्या घरी हा विधी करायचा असतो तिथे जाऊन गोंधळी सर्व पूजासाहित्याची मांडणी करतात. मांडणीपासून प्रत्यक्ष विधीपर्यंत सारे काही प्रतीकात्मक असते. पाटावर नवे वस्त्र घालून कलशादी वस्तू मांडल्या जातात. बाजूला उभे केलेले ऊस म्हणजे आकाश अशी कल्पना केली जाते. पंचमहाभूते, आत्मा, पंचतत्त्व या साऱ्या कल्पना प्रतिकात्मक रूपात या विधीत एकवटतात.
पाच उसांच्या मागे पंचतत्त्वाची कल्पना आहे. तर,मध्यभागी असलेल्या नारळांसह कलशाला ब्रह्मकमळी आत्म्याची उपमा दिलेली आहे. या कलशाला देवी मानून तिला तसा मुखवटा तयार करतात. हळद-कुंकू वाहून नेहमीप्रमाणे पूजा केली जाते. चंद्र-सूर्य आपल्याला प्रकाश देतात म्हणून गोंधळाच्या ठिकाणी प्रकाश निर्माण करणारी दिवटी चंद्र-सूर्यासमान भासते. त्यावर पाच काकडे पेटवून ते या पूजेवरून ओवाळतात. हे काकडे म्हणजे चैतन्याची ज्योत, जी आत्मज्ञानाकडे नेते. त्यानंतर गोंधळाला सुरुवात होते.
एकूणच हा प्रकार मनोरंजनातू आध्यात्माकडे जाणारा. लोकवाङ्मयात याचे स्थान अबाधिंत आहे. लोकधर्म व लोकसाहित्याच्या घडणीत गोंधळ या प्रकाराचा मोठा वाटा आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात हे गोंधळी पोवाडे गाऊन सर्वसामान्यांमध्ये देशाभिमान जागृत करीत होते, अशा नोंदी आहेत.
या विषयी माहिती देताना दिलीप गरुड म्हणाले, ‘‘रूढी-परंपरांना फाटा दिला जात असल्याने गोंधळासाठी बोलाविणे येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे गोंधळी समाजातील मुलांनी नोकरीच्या वाटा धरल्या आहे. नोकरी करण्याशिवाय आमच्यापुढे काही दुसरा पर्याय नाही. आम्हाला पुरेशी प्रतिष्ठा राहिलेली नाही. गोंधळ्यांची जशी ही पिढीजात परंपरा आहे, तशीच तो घालायला बोलाविणाऱ्यांची परंपरा आहे. पेशवेकाळातील सरदारांची पुण्यात घराणी आहे. त्यांच्याकडून आम्हाला गोंधळासाठी नियमित बोलविणे येते. पारंपरिक कला जोपासली जावी म्हणून प्रयत्न असतो. कुटुंबातील मुलांना याचे प्रशिक्षण दिले जाते.’’ (प्रतिनिधी)
पुणे परिसरात केवळ १५ कुटुंबे
४काळ बदलला तशी या समाजाची परिस्थिती बदलली. पुणे आणि परिसरात खऱ्या अर्थाने गोंधळ ही परंपरा जपणारी १० ते १५ कुटुंबे आहेत. नोकरी व्यवसायामुळे एकत्र कुटुंब पद्धती राहिली नसल्यामुळे पारंपरिक पद्धतीने सणवार जपण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कुळाचार बंद करायचा नाही म्हणून ‘गोंधळ’ घालायचा एवढेच त्याचे महत्त्व राहिले आहे. पूर्वीसारखा तो रात्र-रात्र घातला जात नाही.
आमच्या समाजाचे स्वरूप भटके आहे. गोंधळ घालण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जाणे, असे पूर्वापार चालत आले आहे. इतर काही समाजातील लोक गोंधळी असल्याचे भासवून हा विधी करीत आहेत. त्यांना तसा अधिकार नाही. गोंधळाविषयी त्यांना काही माहिती नाही. खरे गोंधळी कोण, या विषयी लोकांनाही काही माहिती नसते.
- दिलीप गरुड, गोंधळी