भिशीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:49+5:302021-06-22T04:08:49+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क उरुळी कांचन : बेकायदेशीर गुंतवणुकीच्या व भिशीच्या नावाखाली उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह परिसरातील पाचशेहून ...

भिशीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्याला अटक
लाेकमत न्यूज नेटवर्क
उरुळी कांचन : बेकायदेशीर गुंतवणुकीच्या व भिशीच्या नावाखाली उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह परिसरातील पाचशेहून अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या आरोपींना गुजरात पोलिसांनी अखेर पाकिस्तानच्या सीमेवरून रविवारी (दि. २०) अटक करण्यात आली. भरतकुमार चरणदास जोशी आणि त्याची दोन मुले हिरेनकुमार जोशी व दीपककुमार जोशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका बड्या व्यापाऱ्याने उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह पूर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहून अधिक ‘बड्या’ असामींकडून सुमारे दोनशे कोटींहून अधिकची माया जमा करून आपल्या कुटुंबीयांसह उरुळी कांचन येथून पोबारा केल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाल्याची घटना पूर्व हवेलीत गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात घडली होती.
या व्यापाऱ्याकडे बडे व्यावसायिक मोठ्या रकमांची गुंतवणूक भिशीत करीत होते. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला होता. या भिश्यांमध्ये गुंतवणूकदारांचा आकडा कोटींच्या घरात पोहोचला होता. मात्र, या हिरेनकुमारने भिशीत गुंतवणूक करणाऱ्या शेकडो गुंतवणूकदारांच्या हातावर तुरी देऊन गंडा घालत पोबारा केला होता. गेल्या वर्षीपासून पोलीस त्याच्या शोधात होते. त्याला पकडण्यासाठी बक्षीसही जाहीर केले होते. लॉकडाऊनपूर्वी भिशी उचलणाऱ्यांनी, लॉकडाऊन सुरू होताच भिशीचे पैसे वेळेवर देण्यास टाळाटाळ सुरु केल्याने हिरेन अडचणीत आला होता. ऑगस्ट महिन्यात त्यांच्या पत्नीला कोरोना झाल्याने उरुळी कांचन परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, व्यापारी रातोरात स्वतः नंतर परिवाराला घेऊन फरार झाला होता. यामुळे गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे कळाल्याने या प्रकाराचे बिंग फुटले होते. दरम्यान, भिशी चालविणारा व्यापारी फरार झाल्याने भिशीत पैसै अडकणाऱ्या केवळ ५ जणांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, भिशीव्यतिरिक्त अन्य प्रकारे फसवणूक झाल्याचे सबळ कारण नसल्याने फसवणूक झाल्याची तक्रार नोंदली जात नसल्याने गुंतवणूकदार हतबल झाले होते.
उरुळी कांचन व परिसरात ‘शेठ’ या टोपणनावाने फेमस असलेला भिशीचालक कुटुंबीयासह महिनाभरापासून फरार झाला होता. उरुळी कांचन गावातील काही गुंतवणूकदारांनी पुढे येऊन सप्टेंबर २०२० ला शेठच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात लेखी स्वरूपात तक्रार दिली होती. ठकास महाठक भेटला.
पुणे जिल्ह्यातील एका आर्थिक गैरव्यवहारात घसरून कुलूप लागलेल्या सहकारी बँकेत या व्यापाऱ्याच्या नावावर अडचणीत आलेल्या संस्थाचालकाने कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढल्याची चर्चा आहे.