पस्तिशीच्या उंबरठ्यावरच स्त्रियांची रजोनिवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST2021-01-08T04:27:50+5:302021-01-08T04:27:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बहुतांश स्त्रियांच्या आयुष्यात रजोनिवृत्तीचा काळ ४५-५० या वयाच्या टप्प्यावर येतो. या काळात महिलांना शारीरिक ...

पस्तिशीच्या उंबरठ्यावरच स्त्रियांची रजोनिवृत्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बहुतांश स्त्रियांच्या आयुष्यात रजोनिवृत्तीचा काळ ४५-५० या वयाच्या टप्प्यावर येतो. या काळात महिलांना शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. आजकाल रजोनिवृत्तीचे अर्थात मासिक पाळी कायमची बंद होण्याचे वय पस्तिशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. अनुवंशिकता, केमोथेरपीसारखे उपचार यामुळे महिलांना कमी वयातल्या रजोनिवृत्तीला सामोरे जावे लागत आहे.
पाळीचे दिवस बदलणे, रक्तस्त्राव कमी किंवा जास्त होणे, ओटीपोटात तीव्र वेदना होणे अशी लक्षणे रजोनिवृत्ती जवळ आल्यास दिसायला लागतात. साधारणपणे वयाच्या ४५ व्या वर्षांनंतर रजोनिवृत्ती जवळ येऊ लागते. आजकाल अनेक स्त्रियांमध्ये हे वय ३५-४० वयोगटापर्यंत खाली आले आहे. रजोनिवृत्ती लवकर आल्यास पुढील १०-१२ वर्षे हार्मोनल थेरपी घेण्याची गरज भासू शकते. कोणतेही औषधोपचार सुरू करण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रंजना देशकर म्हणाल्या, ‘रजोनिवृत्ती येण्याचे वय साधारणपणे ४५-५२ वयोगट एवढे असते. काही स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती लवकर येते. यामध्ये अनुवंशिकता हे प्रमुख कारण असते. याशिवाय, गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्यास अर्थातच मासिक पाळी जाते. कर्करोगासाठी केमोथेरपी, रेडिओथेरपी असे उपचार सुरू असल्यासही मासिक पाळी लवकर जाते.’
--------------
“आपल्या शरीरासाठी इस्ट्रोजेन हे संप्रेरक महत्त्वाचे असते. रजोनिवृत्ती लवकर आल्यास या हार्मोन्सचे प्रमाण असंतुलित होते. घाम येणे, लवकर थकवा येणे, एकाग्रता कमी होणे, चिडचिड होणे, वारंवार मूड बदलणे अशी लक्षणे दिसू लागतात. बरेचदा तरुणी उशिरा लग्न करण्याचा निर्णय घेतात. काही कारणाने त्यांच्यात लवकर रजोनिवृत्ती आल्यास गर्भधारणेत अडचणी येतात. योनीमार्ग कोरडा पडल्यास लैंगिक संबंधांत समस्या येऊ शकतात. ही सर्व गुंतागुंत टाळण्यासाठी तिशीनंतर रक्ततपासणी, सोनोग्राफी तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व तपासण्या वेळेत करून घेणे हिताचे ठरते. समस्येचे वेळीच निदान झाल्यास उपचारही सुरू करता येतात.
- डॉ. मंगला वाणी, स्त्रीरोगतज्ज्ञ
----------------
काय काळजी घ्यावी?
“रजोनिवृत्तीच्या काळात आहार, व्यायामाकडे विशेष लक्ष द्यावे. रजोनिवृत्ती कधीही आली तरी स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतात. अंगदुखी, डोकेदुखी, अकारण चिडचिड होणे, एकटेपणा वाटणे असा त्रास होतो. या नाजूक टप्प्यावर स्त्रीला कुटुंबाने आधार देणे, तिचा त्रास समजून घेणे आवश्यक असते. स्त्रियांनीही स्वत:ला आवडीच्या कामात, छंदात गुंतवून ठेवावे.”
-