टंचाईमुळे जनावरांना बाजाराचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 01:48 IST2016-04-26T01:48:10+5:302016-04-26T01:48:10+5:30

दुष्काळाची दाहकता वाढल्याने चारा-पाणीटंचाईचा प्रश्नही भीषण झाल्याने शेतकरीवर्ग जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवत आहेत.

Market road due to scarcity | टंचाईमुळे जनावरांना बाजाराचा रस्ता

टंचाईमुळे जनावरांना बाजाराचा रस्ता

बेल्हा : दुष्काळाची दाहकता वाढल्याने चारा-पाणीटंचाईचा प्रश्नही भीषण झाल्याने शेतकरीवर्ग जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवत आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यातील बेल्हा येथीलही बैलांच्या आठवडे बाजारात असे चित्र पाहावयास मिळत असून, बैलांची विक्रीस येण्याची संख्या वाढली असून, त्यांची खरेदी मात्र रोडावली आहे.
येथील सोमवारचा आठवडे बैलबाजार जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात सर्वत्रच प्रसिद्ध बाजार आहे. या बाजारात शेतकरी व व्यापारी बैल खरेदी विक्रीसाठी येतात. या बाजाराशिवाय या बाजारात म्हशींचा बाजार व शेळ्या-मेंढ्यांचा बाजार मोठा भरतो. तसेच तरकारी बाजारही मोठा भरतो.
धरण त्यांचे कालवे व नद्यांचे लाभक्षेत्रातील काही ठिकाणांसह इतर सर्व ठिकाणी सध्या दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. उष्णतेच्या तीव्र झळांनी मानवासह पशू-पक्ष्यांनाही याची झळ बसत आहे.
दुष्काळी स्थिती उद्भभवल्यामुळे सध्या सगळीकडे सध्या चारा व पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग त्याच्याकडील जनावरे बाजारात विक्रीस आणत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून बैलांसह इतर जनावरांची विक्रीस येण्याची संख्या कमालीची वाढली आहे.
येथील बैल बाजारात गावठी बैलांचे जोडीचे भाव ३५ ते ४० हजार होते, तर म्हैसुरी बैलजोडीचे भाव ४० ते ४५ हजार होते. तर, म्हशींचे बाजारभावही नेहमीच्या तुलनेत कमी होते.
मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांची खरेदी या कमी झालेल्या बाजारभावातही होत नसल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले. (वार्ताहर)

Web Title: Market road due to scarcity