पुण्यातून ४ फेब्रुवारीला निघणार मराठा संघर्ष यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:14+5:302021-02-05T05:03:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका दुटप्पी असून, न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली आहे. दि. ५ रोजी ...

Maratha Sangharsh Yatra to leave Pune on February 4 | पुण्यातून ४ फेब्रुवारीला निघणार मराठा संघर्ष यात्रा

पुण्यातून ४ फेब्रुवारीला निघणार मराठा संघर्ष यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका दुटप्पी असून, न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली आहे. दि. ५ रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी दि.४ रोजी पुणे ते साष्ट पिंपळगाव अशी मराठा संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मोर्चाचे रघुनाथ चित्रे पाटील, राजेंद्र कुंजीर, नाना निवंगुणे, हनुमंत मोटे, अनिल ताडगे, धनंजय जाधव, मीना जाधव, गणेश मापारी, जगजीवन काळे, जितेंद्र कोंढरे, महेश टिवे आदी उपस्थित होते.

चित्रे पाटील म्हणाले की, दि. ४ रोजी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रेला सुरुवात होईल. दि. ५ रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे.

पुढे ते म्हणाले की, सरकारने डोळ्यांवर आणि कानांवर हात ठेवले आहेत. सरकार जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत आहे. मराठा आरक्षण दिले की लगेच न्यायालयात याचिका दाखल केली जाते. मात्र कोणत्याही समाजाबद्दल आमच्या मनात द्वेष नाही. नियुक्त्या रखडलेल्या आहेत, म्हणुन, आझाद मैदानावर एमपीएससीचे विद्यार्थ्यां आंदोलन करीत आहेत. मात्र सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. दि. ५ रोजी मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार आहे. या सुनावणीवर नजर ठेवणार आहोत. निकाल बाजूने लागला तर स्वागत करणार आहोत. जर विरोधात गेला तर सर्वानुमते पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

चौकट

शरद पवारांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

देशभरात शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला सरकारने पाठिंबा दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीदेखील पाठिंबा दिला. मात्र आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांकडे पवारांनी पाहिलेसुद्धा नाही. त्यांनी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पवारांना याची जाणीव नाही. असली तरी ते दुर्लक्ष करीत आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी देखील याबाबत कोणत्याही प्रकारे भूमिका घेतली नाही. त्यामुळे मराठा समाजाला संघर्ष करावा लागत आहे, असे राजेंद्र कुंजीर म्हणाले.

Web Title: Maratha Sangharsh Yatra to leave Pune on February 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.