माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र हाऊसफुल्ल
By Admin | Updated: July 2, 2015 23:57 IST2015-07-02T23:57:11+5:302015-07-02T23:57:11+5:30
मागील दोन महिन्यांपासून राज्यातील एकमेव असलेल्या माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात तब्बल ९ बिबट्यांची रवानगी करण्यात आल्यामुळे निवारा

माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र हाऊसफुल्ल
लेण्याद्री : मागील दोन महिन्यांपासून राज्यातील एकमेव असलेल्या माणिकडोह बिबट्या निवारा
केंद्रात तब्बल ९ बिबट्यांची रवानगी करण्यात आल्यामुळे निवारा केंद्र सद्य:स्थितीत हाऊसफुल्ल झाले
आहे. सध्या असलेल्या ३६ बिबट्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा पेचप्रसंग व्यवस्थापनाला पडला आहे.
निवारा केंद्रात कायमस्वरूपी ठेवण्यात असलेले २७ बिबटे व आता दाखल झालेले ९ बिबटे यामुळे परिस्थिती उद्भवली आहे. तर, बिबट्या प्रवण क्षेत्रात अजूनही काही बिबट्यांचा वावर असल्याने नव्याने पकडलेले काही बिबटे केंद्रात दाखल झाल्यास त्यांच्या निवाऱ्याची, व्यवस्थापनाची अडचण निर्माण होणार आहे.
देशात जुन्नर तालुक्यात सर्वांत मोठ्या संख्येने बिबट वन्यप्राण्याची संख्या आढळून आल्याची नोंद लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे. जुन्नर तालुक्याच्या एकूण ५८८६ चौ.कि.मी. भौगोलिक क्षेत्रापैकी ५७५ चौ.कि.मी. वनक्षेत्र आहे. तर, एकूण २८४३२ हेक्टर बागायत क्षेत्रापैकी ८१५० हेक्टर क्षेत्रामध्ये उसाची शेती करण्यात आलेली आहे. ऊस शेतीच्या माध्यमातून मिळणारा सदाहरित निवारा, पाणी व पाळीव प्राण्याचे भक्षण यामुळे बिबट्यांसाठी ऊसशेती क्षेत्र उत्तम पोषक निवारा झालेला आहे. मनुष्यवस्ती जवळ सहज व जास्त कष्ट न करता बिबट्यास शिकार उपलब्ध होऊ लागल्याने बिबटे वारंवार मनुष्यवस्तीकडे आपला मोर्चा वळवू लागले. यातूनच माणूस व बिबट्या असा संघर्ष सुरू झाला. जुन्नर तालुक्यात सन २००१ पासून बिबट्यांची समस्या निर्माण झाली.
मानवीवस्तीत घुसलेले, विहिरीत पडलेले, उपद्रवी नरभक्षक बिबट्यांसाठी सुरुवातीला बंदिस्त, तसेच पत्राशेडमध्ये १६ पिंजरे बनविण्यात आले होते.
निवारा केंद्र सन २००६ पासून ‘एसओएस’ या दिल्लीस्थित स्वयंसेवी संस्थेकडे व्यवस्थापनासाठी देण्यात आलेले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांच्या नियोजनातून केंद्राचे व्यवस्थापन केले जाते.