माझा दृष्टिकोन बदलला : किरण राव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 20:25 IST2017-07-27T20:25:26+5:302017-07-27T20:25:30+5:30
गावात एकदाही राहिले नव्हते. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावांना भेट देण्याची संधी मिळाली.

माझा दृष्टिकोन बदलला : किरण राव
पुणे, दि. 27 - गावात एकदाही राहिले नव्हते. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावांना भेट देण्याची संधी मिळाली. लोक किती वर्ष दुष्काळ सहन करीत आहेत, पाण्याअभावी त्यांचे किती हाल होत आहेत, हे ऐकल्यानंतर मन हेलावून गेले. या परिस्थितीतही पाणीप्रश्नावर एकत्रित येऊन चांगलं काहीतरी घडवण्याची त्यांची इच्छा आहे, हीच त्यांच्यामधील सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह पाहिल्यानंतर माझा दृष्टिकोन बदलला असल्याची भावना पाणी फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि दिग्दर्शिका किरण राव यांनी व्यक्त केली.
प्रसिद्ध अभिनेता आमीर खान याने एका मुलाखतीमध्ये देशातील असहिष्णुतेचे वातावरण पाहून पत्नी किरण राव हिला देश सोडून जावे का? असे वाटत असल्याचे सांगून वादाला तोंड फोडले होते. समाजासह सोशल मीडियावर त्याच्या या विधानावर टीकेची झोड उठली होती. या पाश् भूमीवर किरण राव यांना विचारलेल्या प्रश्नावर माझा दृष्टीकोन बदलला असल्याचे सूचकपणे सांगत या वादाला एकप्रकारे पूर्णविराम दिला. पानी फौंडेशनच्या माध्यमातून गावांना भेटी देताना आलेले अनुभव कथन केले. सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेच्या माध्यमातून ‘तुफान आलिया’ हा शो सुरू करण्यात आला होता. स्पर्धेच्या 45 दिवसांच्या कालावधीत केवळ स्टुडिओमध्ये बसून यावर चर्चा न घडविता आमीर आणि किरण यांनी गावोगावी जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे वार्तांकन केले होते, त्या अनुभवाविषयी सांगताना किरण राव म्हणाल्या गावातील लोकांनी आपल्या अडचणी मांडल्या, त्यांचे प्रश्न सांगितले तेव्हा ख-या अर्थाने मनाची कवाडे खुली झाली. लोकचळवळीतून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासंबंधीची माहिती लोकांना दिली तेव्हा या चळवळीबददल लोकांमध्ये उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळाली. कितीतरी गावांमध्ये महिला घराचा उंबरठा ओलांडू शकल्या नव्हत्या. खिडकीतूनच घरी आलेल्या पाहुण्यांना पाहाण्याची त्यांना मुभा होती, पण या चळवळीमुळे त्यांना घरातून बाहेर पडण्यास प्रोत्साहन मिळाले. या चळवळीत सहभागी होण्यासाठी एका मुलीने आपले लग्न पुढे ढकलले. सकारात्मकतेचे जग एकेक गाव व्यापत चालले असल्याचे पाहायला मिळाले, एका प्रश्नासाठी लोकशक्ती एकत्र येऊ शकते या उत्साहामुळेच माझा दृष्टीकोन बदलला असल्याचे त्यांनी सांगितले.