भाजपाचे शहरावरील प्रेम पुतनामावशीचे
By Admin | Updated: January 25, 2017 02:02 IST2017-01-25T02:02:50+5:302017-01-25T02:02:50+5:30
कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की, भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना महापुरुषांबाबतचे प्रेम उफाळून येते. आता त्यांना पिंपरी -चिंचवड शहराबाबत पान्हा फुटला आहे.

भाजपाचे शहरावरील प्रेम पुतनामावशीचे
पिंपरी : कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की, भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना महापुरुषांबाबतचे प्रेम उफाळून येते. आता त्यांना पिंपरी -चिंचवड शहराबाबत पान्हा फुटला आहे. त्यांचे शहरावरील प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मोशीत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी महापौर शकुंतला धराडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अॅड. जयदेवराव गायकवाड, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, दीपक साळुंके, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘विकासकामे करताना आम्ही निवडणुकीचा विचार करत नसून ती आमची जबाबदारी आहे. आमच्याकडे पिंपरी -चिंचवड शहराच्या विकासाची दूरदृष्टी आहे.
खोटे बोल पण रेटून बोल हे शहर भाजपचे काम आहे. आम्ही गोरगरीब नागरिकांना घरे आणि शिलाई मशिन दिली. त्यातही भाजपच्या नगरसेविकेने खोडा घातला आहे. भाजप सरकारने इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाचे थाटामाटात भूमिपूजन केले.
मात्र, पावणेतीन वर्ष झाले तरी प्रत्यक्ष कामाला अजूनही सुरुवात झाली नाही. तसेच मेक इन इंडियाचा नारा देणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात अनेक कंपन्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे विजेची मागणी घटली आहे.’’
(प्रतिनिधी)