दाखले मिळण्यासाठी तारांबळ
By Admin | Updated: July 13, 2015 23:44 IST2015-07-13T23:44:27+5:302015-07-13T23:44:27+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रथमच आॅनलाईन अर्ज भरले जाणार असून, विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी सुविधा केंद्रात इच्छुकांनी गर्दी केली आहे.

दाखले मिळण्यासाठी तारांबळ
मंचर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रथमच आॅनलाईन अर्ज भरले जाणार असून, विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी सुविधा केंद्रात इच्छुकांनी गर्दी केली आहे. कागदपत्रे गोळा करताना इच्छुकांची
दमछाक होत असून, कुठलीही
त्रुटी राहू नये यासाठी माहीतगारांची मदत घेतली जात आहे.
तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यास आज सुरुवात झाली. आॅनलाईन पद्धत समजावून घेणे अनेकांना अवघड बनत आहे. यासाठी माहीतगाराची मदत त्यासाठी घेतली जात आहे.
आॅनलाईन अर्ज भरताना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे फॉर्म भरण्याच्या
पहिल्या दिवशी इच्छुक कागदपत्रे गोळा करताना दिसले. आरक्षित जागांवर निवडणूक लढवण्यासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र
आवश्यक आहे.
एका व्यक्तीची ही कागदपत्रे तयार करताना पंधरा ते वीस मिनिटे लागतात. सायंकाळपर्यंत नायब तहसीलदारांची सही होऊन कागदपत्रे इच्छुकांच्या हातात पडतात.
कागदपत्रे हाती येईपर्यंत इच्छुक उमेदवार अनेकदा सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा करताना दिसतात. ग्रामपंचायत कार्यालयात थकबाकी नसल्याचा तसेच
घरी स्वच्छतागृह असल्याचा
दाखला घ्यावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय गजबजलेले असून ग्रामसेवकांनीसुद्धा
इच्छुकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी
बदल करण्याचा सपाटा लावला आहे. एरवी आढेवेढे घेणारे नागरिक निमूटपणे रक्कम काढून देत असल्याने या आठवडाभरात ग्रामपंचायतीचा महसूल वाढणार आहे.
ग्रामपंचायतीच्या जागा कमी असल्या तरी इच्छुक जास्त आहेत. त्या सर्वांनी कागदपत्रांची तयारी केली आहे. आठ दिवस सुविधा केंद्रांत कामाचे वातावरण राहणार आहे.(वार्ताहर)
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे दाखले नेणारांची संख्या तिपटीने वाढली आहे. बहुतेक उमेदवारांना याबाबत फारशी माहिती नाही. तहसीलदार कार्यालयाने उमेदवारांना मार्गदर्शन केले पाहिजे. गरज लक्षात घेऊन वेळेवर कागदपत्रे देण्यासाठी जास्त वेळ सुविधा केंद्रात काम केले जाते.
-शरदराव शिंदे, महा ई-सेवा केंद्र चालक