बिबट्याची दहशत कायम
By Admin | Updated: January 18, 2016 01:18 IST2016-01-18T01:18:14+5:302016-01-18T01:18:14+5:30
जुन्नर तालुक्यात शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्यांचे हल्ले सुरूच आहे. यामुळे येथील नागरिक दहशतीखाली आहेत. पिंजरे लावूनही बिबट्या सापडत नसल्याने वनविभागही हतबल आहे

बिबट्याची दहशत कायम
जुन्नर तालुक्यात शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्यांचे हल्ले सुरूच आहे. यामुळे येथील नागरिक दहशतीखाली आहेत. पिंजरे लावूनही बिबट्या सापडत नसल्याने वनविभागही हतबल आहे. भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडण्यास टाळत आहेत.
जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, यामध्ये गावागांवामध्ये बिबट्यापासून कसे संरक्षण करावे, याबाबतची माहितीपत्रके वाटण्यात आली आहेत. यामध्ये मोठे पोस्टर, फ्लेक्स, जुन्नरच्या पूर्वभागात चौका-चौकांमध्ये लावण्यात आले आहेत. गावात जमा झालेल्या लोकांशी गटागटाने चर्चा केली जात आहे. वनविभागाचे ५० कर्मचारी तैनात करण्यात आले असून त्यांचे गस्ती पथकही तयार करण्यात आले आहे. याबरोबरच एक वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच, ८ पिंजरे लावण्यात आले आहेत. ऊसतोडणी सुरु असल्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. घटनास्थळाची माहिती घेऊन त्याची आकडेवारी संगणकीकृत करण्यात येत आहे, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आहेत.
-विठ्ठल धोकटे, उपवनसंरक्षण अधिकारी
टाकळी हाजी : सध्या कुकडीकाठ बिबट्याच्या दहशतीखाली असून, या परिसरात (पारनेर) तालुक्यात हाकेच्या अंतरावर दोन महिलांवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे, शेतात काम करणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुकडी नदीकाठच्या जांबुत, वडनेर, टाकळी हाजी, म्हसे, फाकटे, माळवाडी (ता. शिरूर), तर नदीपलीकडे निघोज, ढवणवाडी, मोरवाडी, वडनेर, शिरापूर, चांभुत, रानमळा परिसरात सातत्याने उसाच्या क्षेत्रात बिबट्याचे वास्तव्य आहे.
मागील महिन्यात जांबुत (ता. शिरूर) येथे शेतात काम करीत असलेल्या पंचायत समितीचे सदस्य वसुदेव जोरी यांच्या पत्नीवर सहा वाजता बिबट्याने हल्ला केला होता. परंतु जवळच महिला व पुरुष होते, त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. त्यानंतर पंधराच दिवसांनी जांबुतपासून नदीपलीकडे असलेल्या चांभुत गावात एका महिलेला हल्ला करून ठार मारले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी याच परिसरात दुसऱ्या महिलेलाही जीव गमवावा लागला आहे. या भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ऊसतोडही धीम्या गतीने सुरू आहे. बिबट्यांना मुबलक पाणी, खाद्य, तसेच निवारा असे अनुकूल वातावरण असल्यामुळे रोज कुठेतरी बिबट्या दिसल्याचे शेतकरी सांगतात.
निमगाव सावा : येथे बागवाडी परिसरातील शेतकरी गोरक्षनाथ दशरथ गाडगे यांच्या गोठ्यात बांधलेल्या तीन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले.
शनिवारी रात्री सुमारे सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून दोन शेळ्या जागेवरच ठार केल्या, तर एक शेळी उसात ओढून नेली. या हल्ल्यात सदर शेतकऱ्याचे २० ते २५ हजारांचे नुकसान झाले. शेतकऱ्याला शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांसह जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे यांनी केली आहे. निमगाव सावा परिसरात सुमारे ८ ते ९ बिबटे व अनेक बछडे आढळून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून दररोज शेळ्या- मेंढ्यांवर बिबट्याचे हल्ले होत आहेत. परिसरातील सुमारे ७० टक्के कुत्री बिबट्याने फस्त केली आहेत. शिल्लक राहिलेली कुत्री शेतकरी घरात किंवा गोठ्यात रात्रीच्या वेळी बांधून ठेवत असल्याने ती बचावली आहेत. पाळीव प्राण्यांबरोबरच बिबटे आता माणसांवरही हल्ले करीत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या परिसरात वनविभाग असूनही नसल्यासारखाच आहे. दररोज एवढ्या घटना घडत असताना, बिबट्यांना पकडण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना राबवित नाही. पिंजरा मागितला तर शिल्लक नाही, दिलाच तर तोही शेतकऱ्याने स्वखर्चाने आणायचा, त्यात भक्ष्याची व्यवस्थाही शेतकऱ्यानेच करायची, अशी वेळकाढूपणाची भूमिका वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी घेत असल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.