गोळ्या घालून बिबट्याचे हल्ले थांबणार नाहीत

By Admin | Updated: June 4, 2015 05:24 IST2015-06-04T05:24:15+5:302015-06-04T05:24:15+5:30

बिबट्याचा प्रश्न त्यांना गोळ्या घालून, पिंजऱ्यात पकडून किंवा स्थलांतरित करून सुटणारा नाही. यासाठी जनप्रबोधन होणे गरजेचे आहे.

Leopard attacks will not stop by putting tablets | गोळ्या घालून बिबट्याचे हल्ले थांबणार नाहीत

गोळ्या घालून बिबट्याचे हल्ले थांबणार नाहीत

घोडेगाव : बिबट्याचा प्रश्न त्यांना गोळ्या घालून, पिंजऱ्यात पकडून किंवा स्थलांतरित करून सुटणारा नाही. यासाठी जनप्रबोधन होणे गरजेचे आहे. म्हणून वन विभागाने बिबट्याचा वावर असलेल्या ५९ गावांमध्ये सर्व शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांना एकत्र करून कृती आराखडा तयार केला आहे, असे जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक व्ही. ए. धोकटे यांनी सांगितले.
ही ५९ गावे, बिबट्यांचा हल्ला झाल्याच्या अथवा बिबट्या आढळल्याच्या घटना ज्या भागात घडल्या, त्या भागाचा नकाशा तयार करून निश्चित केली आहेत. या गावांमध्ये वन विभागाबरोबरच इतर शासकीय यंत्रणांचा सहभाग घेऊन कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. हा कृती आराखडा या गावांमध्ये राबविण्यासाठी गावे निश्चित केली आहेत. येथील ग्रामस्थांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
या कृती आराखड्यात बिबट्याचा वावर असलेल्या भागात सध्या पहाटे तीन वाजता लाईट जाते व हीच वेळ बिबट्याच्या वावरण्याची असते. त्यामुळे या भागात भारनियमन बंद होणे अत्यंत गरजेचे आहे.
यासाठी बिबट्याचा वावर असलेल्या गावांमध्ये अखंडित वीजपुरवठा करणे, प्रत्येक
गावात जनप्रबोधन करणाऱ्या शिक्षकांचा, शाळांचा सहभाग करून घेणे, शौचालयासाठी बाहेर
जाणाऱ्या ग्रामस्थांवर बिबट्यांचे हल्ले होऊ नयेत यासाठी शंभर टक्के शौचालय बांधून घेणे, पाळीव जनावरांवर हल्ले होऊ नयेत यासाठी बंदिस्त गोठे बांधणे, विहिरींमध्ये बिबटे पडून दुर्घटना घडू नये यासाठी विहिरींना कठडे बांधणे ही कामे केली जाणार आहेत.
बिबट्या दिसला की पिंजऱ्यात पकडून घेऊन जा किंवा ठार मारा, अशी जी मागणी लोकांची येते, त्याविषयी जनप्रबोधन होणे गरजेचे आहे. तसेच लोकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी, शासन करत असलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, पकडण्याची कायदेशीर प्रक्रिया लोकांना कळावी यासाठी शासकीय यंत्रणेतील स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, वायरमन यांना प्रशिक्षण देऊन तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच या लोकप्रतिनिधींनाही प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत जनप्रबोधन केले जाणार आहे. हा कार्यक्रम कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आला आहे.
माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात असलेले सर्व बिबटे हे जुन्नरमधील नाही. येथे फक्त ४ बिबटे जुन्नरमधील आहेत. बाकीचे बोरवली, धुळे, नाशिक येथून आणलेले बिबटे आहेत. विहिरीत पडलेले बिबटे अथवा रस्त्यावर जखमी सापडलेले बिबटे आपण पकडून ठेवत नाही, तर त्यांच्यावर उपचार करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडतो. जुन्नर परिसरातील लोकांचा या प्राण्यावर जीव आहे. खामुंडीमध्ये वाघदरा म्हणून गाव आहे. येथील लोकांना वाघ नवीन नाही; परंतु डिंगोरे, ओतूर, मढ या भागांत बिबट्याचा जास्तच वावर वाढल्यामुळे लोकांमध्ये या प्राण्याविषयी चीड निर्माण झाली.
मागील दोन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्याच्या तीन घटना घडल्या. या कुटुंबांना तातडीने मदत देण्याचे काम वन विभागाने केले. यासाठी शवविच्छेदनाचा अहवाल, मंडल अधिकाऱ्यांचा वारस हक्काचा दाखला, पंचनामा ही कागदपत्रे तातडीने देण्याचे काम सर्वच
शासकीय विभागांनी केले. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला आठ लाख रुपये तातडीने देऊ शकलो, असे उपवनसंरक्षक व्ही. ए. धोकटे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Leopard attacks will not stop by putting tablets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.