जीवनवाहिन्या मोजतायेत अखेरचा श्वास

By Admin | Updated: February 2, 2017 03:39 IST2017-02-02T03:39:53+5:302017-02-02T03:39:53+5:30

नागरीकरण वाढत आहे. त्याचबरोबर सांडपाण्याचा प्रश्नदेखील निर्माण होत आहे. प्रदूषणयुक्त औद्योगिक कारखान्यांमधील पाणी थेट नद्यांत सोडले जाते.

The last breath in life counting | जीवनवाहिन्या मोजतायेत अखेरचा श्वास

जीवनवाहिन्या मोजतायेत अखेरचा श्वास

बारामती : नागरीकरण वाढत आहे. त्याचबरोबर सांडपाण्याचा प्रश्नदेखील निर्माण होत आहे. प्रदूषणयुक्त औद्योगिक कारखान्यांमधील पाणी थेट नद्यांत सोडले जाते. गावातील सांडपाणीदेखील नदीपात्रात सोडले जात आहे. त्याचबरोबर नद्यांच्या सीमारेषा झपाट्याने कमी होत आहेत.
मानवनिर्मित प्रदूषणरूपी राक्षसाने नद्यांचे अस्तित्व नष्ट होत आहे, हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही. निसर्गाचा प्रकोप झाला तर मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे प्रदूषण आणि नद्यांवरील अतिक्रमण रोखण्याची गरज असल्याचे मत निसर्गतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी व्यक्त केले. जागतिक नदीप्रदूषण दिनाच्या निमित्ताने डॉ. गायकवाड म्हणाले, तीर्थक्षेत्राचे ठिकाण असलेल्या भीमाशंकर येथे भीमा नदीच्या उगमाचा विचार केल्यास नदीच्या उगमाशेजारीच प्लॅस्टिकचे ढीग दिसून येत आहे. भक्ती मार्गाने येणाऱ्या भाविकांकडूनदेखील नकळतपणे प्लॅस्टिकचा कचरा वाढतो. त्यासाठी जागृती केली जाते. परंतु, प्रतिबंध केला जात नसल्याने नियमांची पायमल्ली होते. नद्यांचे पावित्र जपले तर भूगर्भातील पाणी देखील चांगले मिळणार आहे. सध्या नद्यांच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्याचे दिसून येते. बहुतेक नद्यांमध्येच घरातील प्रदूषित कंपन्यांचे पाणी सोडले जाते. त्यामुळे नदीचे अस्तित्व संपतेच. त्याचबरोबर मानवी जीवनही धोक्यात असल्याचे आढळून येत आहे. दूषित पाण्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतीच्या पातळीवर नद्या, ओढे, नाल्यांमध्येच प्रदूषित पाणी सोडले जाते. या संस्था पाणी प्रक्रिया करून सोडले जात आहे, असे सांगतात. परंतु, नद्या प्रदूषित होणार नाही, याची काळजी घेतली जात नाही, अशी खंत डॉ. गायकवाड यांनी व्यक्त केली.
रासायनिक पाणी सोडल्यामुळे नद्यांच्या पात्रात गारवेलसारख्या वनस्पती वाढतात. इंदापूर तालुक्यातील भिगवणच्या उजनी जलाशय परिसरातील भीमा नदीची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यावर काहीच उपाययोजना होत नाही.

नद्या संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करा़़़

बेसुमार होणारा वाळूउपसा रोखणेदेखील महत्त्वाचे आहे. वाळूउपशामुळे पाणी स्वच्छ होण्याची प्रक्रिया थांबते. वाळूमध्ये अनेक जिवाणूंच्या प्रक्रिया होवून पाणी स्वच्छ होते. त्यामुळे देशातील नद्या संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बेसुमार वाळूउपशावर मर्यादा आणणेदेखील गरजेचे आहे.

भीमा नदीसह अन्य नद्यांमध्ये प्रदूषित कचरा टाकण्याचे प्रमाण कमी नाही. अगदी बारामती शहरातून जाणाऱ्या कऱ्हा नदीतच सांडपाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रदूषण वाढते. प्रदूषणमुक्त नदी करण्याची गरज आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय स्तरावरदेखील हा विषय गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे. सध्या नदीकाठच्या लोकांना देखील स्वच्छ पाणी मिळत नाही.

प्रदूषित पाण्यामुळे जनावरांच्या प्रजनन क्षमतेला धोका निर्माण झाला आहे. नायट्रोजनचे प्रमाण
वाढते. मिथेन, हायड्रोजन सल्फाईड असे घातक रसायन तयार होत असल्याने नद्या जीवनदायनी नव्हे तर मानवनिर्मित मृत्युदायिनी म्हणून दिसत आहेत. त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: The last breath in life counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.