जमीन खरेदी-विक्रीतून होतात खून
By Admin | Updated: July 3, 2015 00:34 IST2015-07-03T00:34:18+5:302015-07-03T00:34:18+5:30
जमीन खरेदी-विक्री व्यवहारात कमी श्रमात ‘इस्टेट एजंट’ मंडळींना लाखो रुपये कमिशन मिळते. या आमिषापोटी अनेक जण या क्षेत्रात ‘एजंट’ म्हणून फिरत आहेत.

जमीन खरेदी-विक्रीतून होतात खून
पिंपरी : जमीन खरेदी-विक्री व्यवहारात कमी श्रमात ‘इस्टेट एजंट’ मंडळींना लाखो रुपये कमिशन मिळते. या आमिषापोटी अनेक जण या क्षेत्रात ‘एजंट’ म्हणून फिरत आहेत. गल्लोगल्ली त्यांचा सुळसुळाट वाढला आहे. भरपूर कमाई असल्याने ग्राहक मिळविण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे. या चढाओढीतून हल्यापासून खूनापर्यंत घटना घडल्या आहेत.
देशातील टॉप सिटींपैकी पुणे शहर एक आहे. शहराचे क्षेत्रफळ झपाट्याने विस्तारत आहे. शेजारच्या ग्रामीण आणि उपनगरात घर आणि जमिनीस पसंती दिली जात असून, त्याला मागणी वाढली आहे. साहजिकच पिंपरी-चिंचवड शहर, तसेच आजुबाजूला जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपरीगाव, वाकड, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड, भोसरी, कासारवाडी, आकुर्डी, रावेत, किवळे, पुनावळे, चिखली, मोशी, आळंदी रस्ता आदी भागांत हे व्यवहार अधिक होत आहेत.
जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे यात लाखो रुपयांचा व्यवहार होत आहे. शहरात एक गुंठा जमिनीचा दर दहा लाखांच्या वर आहे. काही भागात हाच भाव दुप्पट ते तिप्पट आहे. त्यामुळे कमिशनपोटी एजंटला अधिक रक्कम मिळते. यातून या क्षेत्रात शेकडो तरुण उतरले आहेत. थोडाफार संपर्क आणि संभाषणकौशल्यावर हा बिगरभांडवली धंदा फोफावला आहे. महिलांचाही शिरकाव वाढत आहे. मोठी रोख रक्कम हातात पडत असल्याने गुंड प्रवृत्तीची मंडळीही यात उतरली आहेत. त्यांची मोठी साखळीच तयार झाली आहे. एजंटची संख्या वाढल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. त्यामुळे अशा एजंटच्या टोळ्याच शहरभर वावरत आहेत. अनेक ठिकाणी अशा एजंटनी कार्यालय थाटले आहे. व्यवहार फिसकटणे, तिसऱ्यांशी व्यवहार करणे, जागेचा दर्जा, कमिशन कमी देणे किंवा बुडविणे असे प्रकार घडत आहेत. परिणामी ग्राहक, मालक आणि एजंटमध्ये वाद उद्भवतात. या रोषातून त्यांच्यामध्ये हाणामारीचे प्रकार घडत आहेत. प्रसंगी प्राणघातक हल्ले केले जात आहेत. सुपारी देऊन एखाद्याचा काटा काढला जात आहे. वादातील जागा बळकावणे, जागेवर ताबा मिळविणे, अतिक्रमण हटविणे आदीसाठी याच मंडळींचा पुढाकार असतो. जमिनीच्या वादातून शहरात खुनी हल्ले आणि खुनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. रावेत, निगडी, वाल्हेकरवाडी, हिंजवडी, पिंपळे गुरव, सांगवी, तळेगाव, मोशी आदी ठिकाणी खुनाचे प्रकार वर्षभरात झाले आहेत. पिंपळे गुरव येथील घटना तर ताजी आहे. (प्रतिनिधी)
पैशांची चटक जीवघेणी
एजंटला कमिशनपोटी लाखो रुपये झटक्यात मिळतात. व्यवहार सुरू झाल्यापासून त्यातून मिळणाऱ्या मोबदल्याची आस धरून बसतात. व्यवहारात अनेक एजंट असल्याने प्रत्येकाचा हिस्सा ठरलेला असतो. हातात मोठी रोख रक्कम पडते. त्यामुळे व्यवहारात कमिशनवरून खटके उडतच असतात. व्यवहार होऊनही अपेक्षित कमिशन न मिळाल्याने वादाची ठिणगी पडते. काही जण अधिक लालसेपोटी इतरांना कमी कमिशन देतात किंवा ते देणे टाळतात. त्यातून मारहाण केली जाते. कायमचा दूर करण्यासाठी हत्या होतात.