अश्विनीच्या मृत्यूने ‘जे’ ब्लॉक स्तब्ध
By Admin | Updated: January 21, 2015 00:31 IST2015-01-21T00:31:27+5:302015-01-21T00:31:27+5:30
एमआयडीसीतील ‘जे’ ब्लॉक परिसर अक्षरश: स्तब्ध झाला. अश्विनीबाबत हळहळ व्यक्त होत असताना पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

अश्विनीच्या मृत्यूने ‘जे’ ब्लॉक स्तब्ध
पिंपरी : छेडछाड व पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे मृत्यूला कवटाळलेल्या अश्विनीने जगाचा निरोप घेतल्याची बातमी समजताच वारकड कुटुंबीय राहत असलेले इंद्रायणीनगर, तसेच त्यांचे कँटीन असलेल्या एमआयडीसीतील ‘जे’ ब्लॉक परिसर अक्षरश: स्तब्ध झाला. अश्विनीबाबत हळहळ व्यक्त होत असताना पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
इंद्रायणीनगर येथील राजवाडा परिसरात वारकड कुटुंब वास्तव्यास आहे. पती, पत्नी दोन मुलांसह राहत असलेल्या या कुटुंबाचा उदरनिर्वाह एमआयडीसीतील छोट्याशा कँटीनवर सुरू आहे. त्यामुळे दोन्ही मुले शाळेत गेली, की पतीसह पत्नीदेखील कँटीनवर जात असे. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील वारकड कुटुंबीय सुरुवातीला भोसरीतील लांडगेनगर येथे राहत होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी इंद्रायणीनगर येथे राजवाडा परिसरात भाड्याने सदनिका घेतली. नवख्या ठिकाणी आल्यानंतर कुटुंबावर अशी वेळ येईल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते.
मात्र, या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला असून, महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. ३१ डिसेंबरला वारकड कुटुंबीय राहत असलेल्या राजवाडा सोसायटीत अश्विनीची छेडछाड करणाऱ्यांनी गोंधळ घातला होता. पालकांना धक्काबुक्की करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून या घटनेची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. दरम्यान, २ जानेवारीला अश्विनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी रात्री अश्विनीचा मृत्यू झाल्याने इंद्रायणीनगरातील रहिवाशांना धक्काच बसला. अंत्यसंस्कारांसाठी वारकड कुटुंबीय मूळ गावी गेले असले, तरी नागरिक त्यांच्या घरासमोर गर्दी करीत आहेत. परिसरातील महिला घोळक्याने बसून या घटनेबाबत चर्चा करीत असतानाच स्वत:च्या मुलींच्या सुरक्षिततेबाबतही काळजी व्यक्त करीत आहेत.
दररोज एमआयडीसीतील वारकड यांच्या कँटीनमध्ये चहा अथवा नाश्त्यासाठी जाणारे कामगार या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करीत आहेत. २ जानेवारीला घडलेल्या घटनेनंतर अश्विनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई-वडील दोघेही तिच्या जवळच असायचे. त्यामुळे २ जानेवारीपासून कँटीन बंदच आहे. (प्रतिनिधी)