आयव्हीएफ उपचारांमध्ये गेल्या पाच वर्षांत दुपटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:17+5:302021-02-05T05:17:17+5:30
गर्भधारणेत अडचणी निर्माण होत असल्यास बरेचदा नात्यात तणाव निर्माण होतो. पती अथवा पत्नीच्या शरीरातील संप्रेरकांचे असंतुलन, पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या ...

आयव्हीएफ उपचारांमध्ये गेल्या पाच वर्षांत दुपटीने वाढ
गर्भधारणेत अडचणी निर्माण होत असल्यास बरेचदा नात्यात तणाव निर्माण होतो. पती अथवा पत्नीच्या शरीरातील संप्रेरकांचे असंतुलन, पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या अथवा स्त्रियांमधील बीजांडांची संख्या अशा अनेक कारणांमुळे वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी आयव्हीएफ उपचारपद्धतीच्या मदतीने गर्भधारणा यशस्वी होऊ शकते, असे मत आयव्हीएफ तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. आयव्हीएफ उपचार पद्धतीत शुक्रजंतूच्या मदतीने बीजफलन केले जाते आणि त्यानंतर हे फलित बीज गर्भाशयात सोडले जाते. उपचार सुरु केल्यापासून सुमारे ८५ टक्के जोडप्यांना एका वर्षांमध्ये गर्भधारणा होऊ शकते, असेही सांगण्यात आले.
भारतामध्ये सहापैकी एका दांपत्याला व्यंध्यत्वाच्या समस्येने ग्रासले आहे. वंधत्वावर उपचार घेण्यात जेवढा उशीर होत जातो, तेवढी स्त्रीची प्रजननक्षमता क्षीण होत जाते. त्यामुळे व्यंध्यत्वावरील उपचारांमध्ये काही महिन्यांचा उशीरसुद्धा काही जोडप्यांसाठी नुकसानकारक ठरू शकतो. आजकाल आयव्हीएफ उपचार सेवा आॅनलाईन मिळणेही शक्य झाले आहे. स्टिम्युलेशन, मॉनिटरिंग, इन्जेक्शन ही सर्व प्रक्रिया रुग्णांच्या घरी, तर बिजांडाची निवड आणि भ्रूण हस्तांतरणाची प्रक्रिया क्लिनिकमध्ये केली जाते, असे वैैद्यकीय संचालक डॉ. दुर्गा राव यांनी सांगितले.
--------------------
विवाहाचे वय वाढल्यास अथवा उशिरा मूल होऊ देण्याचा निर्णय घेतल्यास बरेचदा गर्भधारणेत अडचणी येतात. असुरक्षित गर्भपातामुळे प्रजननक्षमता कमी झालेल्या जोडप्यांचे प्रमाण १० टक्के इतके आहे. अशा वेळी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित झालेली आयव्हीएफ उपचारपध्दती वरदान ठरत आहे. उपचारपध्दतीबाबतची उपयुक्तता लक्षात आल्याने जनजागृतीही वाढली आहे. आयव्हीएफ उपचारांमधून यश मिळण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे.
- डॉ. सुप्रिया पुराणिक, आयव्हीएफतज्ज्ञ
---------------------------
आयव्हीएफ उपचार घेणा-यांमध्ये गेल्या चार-पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. उपचार सुरु असताना जोडप्यांनी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. आहारात ताजी फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या यांचा समावेश करणे हिताचे ठरते. उपचार सुरु असताना धुम्रपान, मद्यपान टाळावे. आजूबाजूच्या लोकांकडून नानाविध सल्ले मिळतात, टोमणे ऐकावे लागतात. याकडे दुर्लक्ष करायला शिकावे. हलका व्यायाम, आवडीचा छंद जोपासणे आरोग्याचे दृष्टीने लाभदायक ठरते.
- डॉ. मयुरा जोशी, स्त्रीरोगतज्ज्ञ