साडेदहा लाख टन गाळप करणार
By Admin | Updated: October 27, 2015 00:45 IST2015-10-27T00:45:54+5:302015-10-27T00:45:54+5:30
हंगामात विघ्नहर कारखान्याने १० लाख ५० मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी कारखान्यात गेटकेनचा ऊस आणणार नाही

साडेदहा लाख टन गाळप करणार
नारायणगाव : हंगामात विघ्नहर कारखान्याने १० लाख ५० मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी कारखान्यात गेटकेनचा ऊस आणणार नाही. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सर्व उसाचे गाळप करण्यात येईल. या हंगामासाठी आपण ३०२ ट्रक/टोळ्या व १२५० टायरगाडीचे नियोजन केलेले आहे. तसेच ५ ऊसतोडणी यंत्रे ऊसतोडणी व वाहतुकीसाठी सज्ज झालेली आहेत, असे मत श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी व्यक्त केले.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. एकरी जास्तीतजास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या ५१ ऊसउत्पादकांच्या हस्ते या हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकरी १२६ टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकरी कलावती हरिभाऊ चव्हाण या होत्या.
या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, सुमित्राताई शेरकर, आमदार शरद सोनवणे, अशोक घोलप, आशाताई बुचके, सुरेखाताई मुंढे, तात्यासाहेब गुंजाळ, संजय काळे, रघुनाथ लेंडे, संगीता वाघ, संतोष वाघ, शिवनेर भूषण विठ्ठलबाबा मांडे, राजाराम महाराज जाधव, नंदूकाका शेरकर, तान्हाजी बेनके, गणेशभाऊ कवडे, गजानन महाराज शिक्षण संस्थेचे वैभव तांबे, राजेंद्र बनकर, अजित काळे, हनुमान हांडे, अजितकाका परदेशी आदी उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बोलताना शेतकरी मोहन थोरात म्हणाले की, ऊस उत्पादकांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करणे ही संकल्पना अध्यक्ष सत्यशिल शेरकर व संचालक मंडळाने राबवून शेतकऱ्यांना सन्मान दिल्याने आम्ही भारावून गेलो आहे. कारखाना व्यवस्थापनाने केलेल्या या सन्मानामुळे आम्हाला शेती व्यवसायाकरिता अधिक प्रेरणा मिळणार. कलावती चव्हाण म्हणाल्या, गेली ३५ वर्षांपासून मी काळ्या आईची सेवा म्हणून शेती व्यवसाय करीत आहे. कारखाना व्यवस्थापनाकडून ऊसपीक व्यवस्थापनाबद्दल होत असलेल्या मार्गदर्शनामुळेच मी विक्रमी ऊस उत्पादन घेऊ शकले. कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर आणि संचालक मंडळाकडून आमचा बहुमान केला त्याबद्दल धन्यवाद. सुहास शेटे यांनी सूत्रसंचालन केले, तर अशोक घोलप यांनी आभार मानले. (वार्ताहर)