‘तो’ मानवतेवरील हल्ला
By Admin | Updated: February 14, 2017 02:29 IST2017-02-14T02:29:01+5:302017-02-14T02:29:01+5:30
बॉम्बस्फोटांच्या सारख्या घटना काळाच्या ओघात आपण विसरून जातो, मात्र या घटना कधीही न भरून येणारी

‘तो’ मानवतेवरील हल्ला
पुणे : बॉम्बस्फोटांच्या सारख्या घटना काळाच्या ओघात आपण विसरून जातो, मात्र या घटना कधीही न
भरून येणारी जखम देऊन जातात. जर्मन बेकरीमध्ये झालेला बॉम्बस्फोट म्हणजे मानवतेवर केलेला आघात होता. यामधून धडा घेऊन आपण सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मानसी जाधव यांनी व्यक्त केले.
कोरेगाव पार्क भागातील जर्मन बेकरीमध्ये १३ फेब्रुवारी २०१० रोजी संध्याकाळी इंडियन मुजाहीदीन या दहशतवादी संघटनेने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रुणवाल, बेकरीचे राजन उडाणे, कुणाल उडाणे, स्नेहल खरोसे, अभिजित वाघचौरे, कोमल वाघचौरे, दीपिका मंत्री, तृप्ती गायकवाड, लता शेलार आदी उपस्थित होते.
बॉम्बस्फोट झाल्यानंतर पहिल्या श्रद्धांजली सभेला प्रचंड गर्दी होती. गेल्या सात वर्षात नागरिक ही घटना हळूहळू विसरू लागले आहेत. आपल्या जाणिवा जाग्या पाहिजेत. अशा घटना रोखायच्या असतील तर आपल्या संवेदना जपल्या पाहिजेत. जातपात धर्मभेद विसरून एकत्र आलो तरच देश भावना टिकेल, असे रुणवाल या वेळी म्हणाले. या बॉम्बस्फोटामध्ये १७ नागरिकांचा बळी गेला होता. यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश होता.