‘आयएसओ’ ची १0 मानांकन
By Admin | Updated: January 24, 2015 23:10 IST2015-01-24T23:10:44+5:302015-01-24T23:10:44+5:30
चार जिल्हा परिषद शाळा व दोन अंगणवाड्या अशी एकूण १0 आयएसओ मानांकने एकाच वेळी प्राप्त करणारे भूगाव (ता. मुळशी, जि. पुणे) हे महाराष्ट्रातील पहिलेच गाव.

‘आयएसओ’ ची १0 मानांकन
प्रदीप पाटील - पौड
ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, केंद्रप्रमुख कार्यालय, चार जिल्हा परिषद शाळा व दोन अंगणवाड्या अशी एकूण १0 आयएसओ मानांकने एकाच वेळी प्राप्त करणारे भूगाव (ता. मुळशी, जि. पुणे) हे महाराष्ट्रातील पहिलेच गाव.
ग्रामस्थ एकत्र आले तर काय करू शकतात याचेचे हे उत्तम उदाहरण. त्यांना साथ मिळाली ती शिक्षक, अंगणवाडी तार्इंची. १५ आॅगस्ट २0१४ रोजी भूगाव या गावाने एक आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला. त्यातूनच आयएसओ मानांकन मिळवण्याची संकल्पना पुढे आली. ग्रामपंचायतीबरोबरच जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या तसेच शाळेचे केंद्रप्रमुख कार्यालयासही आयएसओ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले, आणि गाव कामाला लागला. मागील काही वर्षांपूर्वी एक खेडे म्हणून अस्तित्वात असलेल्या भूगावचे रूपांतर आता निमशहरी गावात झाले आहे. पुणे शहराच्या हद्दीपासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाची नोंदणीकृत लोकसंख्या २0११ च्या जनगणनेनुसार ५ हजार ९७५ एवढी तर एकूण लोकसंख्या जवळपास १५ ते १६ हजारांच्या आसपास आहे. आज गावात १00 टक्के शौचालये झाली असून, गाव हगणदरीमुक्त आहे. एकूण १३ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. गावाला आतापर्यंत निर्मलग्राम, तंटामुक्ती पर्यावरणप्रेमी गाव, हगणदरीमुक्त गाव हे राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आयएसओ मानांकनासाठी असलेले ७६ निकष ग्रामपंचायतीने अ श्रेणीत पूर्ण केले.
१00 टक्के टँकरमुक्त
गावाला दररोजच्या वापरासाठी व पिण्यासाठी एकूण ७ लाख लिटर पाणी लागते. त्यातील १ लाख लिटर पाणी महानगरपालिकेकडून मिळते. ते पुरेसे नसल्याने गावातील एक ग्रामस्थ व तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब चोंधे यांनी स्वत:च्या शेतीतील खासगी विहिरीचे पाणी गावासाठी चोवीस तास उपलब्ध करून दिले आहे. मागील वर्षी टँकरने पाणी पिणारे भूगाव आज १00 टक्के टँकरमुक्त झाले आहे.
प्रशस्त व आधुनिक स्मशानभूमी
गावातील स्मशानभूमी प्रशस्त व आधुनिकपणे बांधण्यात आली आहे. या ठिकाणच्या धुराच्या प्रदूषणाचा त्रास जवळच्या ग्रामस्थांना होऊ नये यासाठी येथे स्वयंचलित निर्धूर यंत्रणा बसवण्यात आली असून, पावसाळ्यासाठीचा आवश्यक निवारा, वीज, पाणी, आप्तेष्टांसाठी विसावा कक्षही तयार करण्यात आला आहे.
४ ग्रामसचिवालयाची सुसज्ज व अद्ययावत इमारत असून, दैनंदिन कामकाजासाठी एकूण आठ कक्ष तयार केले आहेत. ग्रामस्थांच्या सोयीकरिता लागणारी सर्व कार्यालये एकाच छताखाली आणलेली आहेत.
४मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे यांची साफसफाई ग्रामपंचायतीचे चार कर्मचारी, अन्य ६ मजूर व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने केली जाते.
४ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी स्वत:ला मिळणारे मानधन न घेता ते शाळेच्या विकासकामासाठी देणगी म्हणून देतात.
४सर्व मुलांना बसण्यासाठी बेंचेस व ज्या वर्गात बेंचेस नाहीत त्या वर्गात मॅट टाकण्यात
आले आहे.
४शाळेत सर्व आर्थिक स्तरातील मुली शिक्षण घेतात. इंग्रजी माध्यमाकडे जाण्याचा कल कमी होऊन शाळेच्या पटात लक्षणीय वाढ झाली आहे.
४गाव परिसरातील एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी वर्षभर प्रवेश मोहीम. नव्याने दाखल होणाऱ्या मजूर व कामगारांच्या मुलांसाठी विशेष अध्यापन व्यवस्था.
४मुलांकरिता शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेबरोबरच स्थानिक देणगीदारांच्या मदतीने उच्चप्रतीचा पोषण आहार दिला जातो.
४ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक पद्धत अवलंबण्यात येते.
४गावातील पथदिवे संपूर्णत: कार्यरत ठेवण्यात आले आहेत.
४गावाच्य सुरक्षेसाठी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे .
४आवश्यक त्या ठिकाणी सर्व प्रकारचे नामनिर्देशाचे, माहितीचे फलक लावले आहेत.
४सातवीपर्यंत असलेल्या दोनही शाळांत प्रत्येक २ हजार पुस्तकांची सुसज्ज ग्रंथालये आहेत.
४संपूर्ण रस्त्याचे सिमेंटीकरण झाले असून, सर्व रस्ते सातत्याने कचरामुक्त ठेवण्यात येतात.
गाव लागला कामाला
पुण्यापासून जवळ परंतु छोटेसे खेडेगाव असलेल्या भुगावचे रूपांतर ग्रामस्थांच्या जिद्दीमुळे आज एका निमशहरी गावात झाले आहे. ग्रामस्थ एकत्र आले तर काय करू शकतात याची मुर्तीमंत उदाहरण म्हणजे भूगाव आहे. गेल्यावर्षीच १५ आॅगस्टला भुगावला आदर्श ग्रामपंचायतीचा मान मिळाला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी आयएसओ मानांकत मिळविण्यासाठी निर्धार केला आणि पाहता पाहता गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या, शाळेचे केंद्रप्रमुख कार्यालयास आयएसओ मानांकत मिळाले. आज १५ ते १६ हजारांच्या लोकवस्तीच्या या गावात १00 टक्के घरांमध्ये शौचालये आहेत.
सरपंचाचे पद हे केवळ मिरवण्याकरिता नसून, सर्व समस्या सोडविणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असते. मी त्यासाठी काम केले, त्यामुळे आम्हाला
हे यश मिळाले.
- विजय सातपुते, सरपंच
ग्रामस्थांच्या व पालकांच्या सहकार्याशिवाय कोणत्याही शाळेचा विकास अशक्यच. तसेच सहकारी शिक्षकांनी कामात झोकून दिल्याशिवाय शाळेची गुणवत्ता वाढणेही अशक्य.
- लहू बाबा गायकवाड,
मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक
गावातील जबाबदार नागरिकांनी पदावर विराजमान असलेल्या व्यक्तींना योग्य सल्ला, मार्गदर्शन केले तर गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या नवीन कल्पना अमलात येऊ शकतात. आम्ही तेच केले.
- दगडू काका करंजावणे,
संंकल्पनेचे प्रेरक