‘आयटी सिटी’मध्ये हव्यात पायाभूत सुविधा

By Admin | Updated: January 25, 2015 00:19 IST2015-01-25T00:19:53+5:302015-01-25T00:19:53+5:30

हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आयटी क्षेत्राचा विस्तार होत आहे. त्या तुलनेत पायाभूत सुविधांची पूर्तता होणे अपेक्षित आहे.

Infrastructure in 'IT City' | ‘आयटी सिटी’मध्ये हव्यात पायाभूत सुविधा

‘आयटी सिटी’मध्ये हव्यात पायाभूत सुविधा

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आयटी क्षेत्राचा विस्तार होत आहे. त्या तुलनेत पायाभूत सुविधांची पूर्तता होणे अपेक्षित आहे. मात्र, शासकीय संस्थांची कामकाज पद्धती, यंत्रणेतील समन्वयाचा अभाव यामुळे सुविधांची पूर्तता होण्यास विलंब होतो. त्यात सुधारणा घडून याव्यात, अशी अपेक्षा लोकमत कार्यालयात आयोजित केलेल्या परिचर्चेत हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
लोकमत पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयात हिंजवडी आयटी पार्कमधील समस्यासंदर्भात परिचर्चा झाली. हिंजवडी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पटवर्धन, प्रशासकीय प्रमुख कर्नल चरणजित भोगल, सेक्रेटरी ऋचा आंबेकर, तसेच व्यवस्थापन समिती सदस्य सुनील अडवाणी यांनी या परिचर्चेत सहभाग नोंदवला.
प्रत्येक कंपनीने त्यांच्या वैयकितक पातळीवर प्रयत्न करून समस्यांवर तोडगा काढणे कठीण जाते. त्यामळे एकत्रित येणे आवश्यक असल्याने हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांनी २००७ मध्ये असोसिएशन स्थापन केली आहे. त्या माध्यमातून पाठपुरावा करणे शक्य झाले आहे. आयटी कंपन्यांमध्ये विविध पदांवर काम करणाऱ्या व्यक्ती असोसिएशनमध्ये विविध पदांचा पदभार सांभाळत आहेत.
असोसिएशन हे एक प्रकारे शासन संस्था आणि उद्योजक यांच्यातील दुवा आहे. सुरक्षा आणि दळवळण सुविधांबाबतीत अधिक आग्रही भूमिका घेऊन असोसिएशन प्रयत्नशील आहे. पुढाकार घेऊन असोसिएशनने पोलिसांच्या सहकार्याने ३ शीघ्र कृती दल, तसेच ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. वाहतूकव्यवस्था सुरूळीत व्हावी, यासाठी स्वखर्चाने १० वॉर्डन नेमले आहेत. या ठिकाणी येणारे बहुतांशी कर्मचारी स्वत:च्या वाहनाने येतात. सक्षम सार्वजनिक वाहतूक सुविधा असल्यास हे प्रमाण कमी होईल. अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक बससुविधेचा वापर करावा, यादृष्टीने लवकरच खास आयटी क्षेत्रासाठी स्वतंत्र ५० बसगाड्या मार्गावर सोडल्या जाणार आहेत. आयटी पार्कलगतच्या भागातील परिसरात कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. आजूबाजूच्या ग्रामीण भागातही नागरीकरण वाढले आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्षम यंत्रणा कार्यान्वित करणे ग्रामपंचायत स्तरावर शक्य होत नाही. त्यासाठी शासनस्तरावरून स्वच्छता अभियानासारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले पाहिजेत. या बाबींची प्राधान्याने दखल घेतली पाहिजे, असे मत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यकत केले. आयटी परिसरात प्रवेश करण्याच्या मार्गावर स्वच्छता राखली जाईल, याची दक्षता घेतली पाहिजे. (प्रतिनिधी)

उद्योजकांसाठी असोसिएशन ठरतेय दुवा
हिंजवडी आयटी क्षेत्रातील कंपन्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने २००७ मध्ये हिंजवडी इंडस्ट्रिज असोसिएशनची स्थापना झाली. महत्त्वाच्या नामांकित कंपन्यांसह ४५ कंपन्या असोसिएशनच्या सदस्य आहेत. सुरक्षा, दळणवळण अशा स्वतंत्र समित्यांच्या माध्यमातून कामाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी शासनाच्या विविध संस्थांकडे पाठपुरावा करण्याचे काम असोशिएशन करते. जीपीएससह अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या मेट्रो झिप बस सोडल्यास कर्मचाऱ्यांनाही सुरक्षित प्रवास करता येईल.स्वत:ची वाहने वापरण्याचे प्रमाण कमी झाल्यास या मार्गावरील वाहतूक कोडींची समस्या दूर होईल. आयटी कंपन्या त्यांच्या स्तरावर स्वच्छता, सुरक्षिततेच्या उपायोजना करण्याचा कसोशिने प्रयत्न करतात. कंपन्यांनी विविध प्रकारच्या कचऱ्याची योग्य प्रक्रियेव्दारे विल्हेवाट लावण्याची व्यवस्थापन केले आहे. ई कचऱ्याची विल्हेवाट या यंत्रणा कार्यन्वीत केल्या आहेत.
- अनिल पटवर्धन, अध्यक्ष - हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन

दळणवळण सुविधा सक्षम असावी
हिंजवडी आयटी पार्कमधील उद्योजक, अभियंते यांना वाहतूककोंडीची समस्या कायम भेडसावते. आयटी पार्ककडे जाण्याच्या रस्त्यावर आयटी पार्कमधील कंपन्यातील अभियंते, कर्मचारी यांच्याशिवाय अन्य वाहनांचीही वर्दळ अधिक असते. आयटी पार्ककडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग नाही. असोसिएशनने पाठपुरावा करून बालेवाडी ते हिंजवडी या प्रस्तावित रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. एमआयडीसी, पाटबंधारे खाते, महापालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत अशा विविध स्तरांवर पाठपुरावा करणे भाग पडते. वेळ खर्ची घालणारी ही प्रक्रिया आहे. या शासकीय संस्थांमध्ये समन्वयाची यंत्रणा कार्यान्वित असल्यास विविध पातळ्यांवर पाठपुरावा करावा लागणार नाही. आयटी पार्कमध्ये परदेशातील अनेक कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. परदेशातून या भागात येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांना आयटी पार्कमध्ये पोहोचेपर्यंत वाहतूककोंडीतून मार्ग काढत यावे लागते. आयटी पार्क ते पुणे विमानतळापर्यंत जाण्यासाठी वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था उत्तम दर्जाची असावी, अशी अपेक्षा आहे.
- कर्नल चरणजित भोगल, असोसिएशनचे प्रशासकीय प्रमुख

आयटी धोरणात बदल आवश्यक
राज्य शासनाने तयार केलेल्या आयटी कंपन्याच्या संदर्भातील धोरणात काही बदल करणे गरजेचे आहे. असोशिएशनने धोरणात काही बदल सुचविले आहेत. आयटी कंपन्यांसाठीची कर प्रणाली असो की, सवलतीचे धोरण त्यात स्पष्टता दिसून येत नाही. शासनाकडून उद्योजकांसाठी योजना जाहिर होतात, त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. शासनाच्या संदिग्ध धोरणामुळे जे उद्योजक आहेत, त्यांना सवलतींचा लाभ घेता येत नाही. रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने हिंजवडी आय टी पार्कमध्ये दरवर्षी १२ ते १५ टक्के वाढ होत आहे. सुविधांच्या पुर्ततेचा वेगही वाढला पाहिजे.अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. असोशिएशनच्या माध्यमातून उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर सामाजिक जबाबदारी म्हणून आयटी पार्कसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला बाधा पाहोचू नये, यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखण्याची दक्षता घेतली जाते. वृक्षलागवड, वृक्षसंवर्धनाचे उपक़्रम राबवले जातात. शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाते, तसेच आयटी प्रशिक्षण देण्यातही सक्रीय सहभाग असतो.
- ऋचा आंबेकर, सेक्रेटरी- हिंजवडी इंडस्ट्रिज असोशिएशन

शासकीय कामेही आॅनलाईन व्हावीत
एमआयडीसी, महापालिका, पीडब्ल्यूडी खात्याशी संबधित कामे करण्यासाठी उद्योजकांना वारंवार शासकीय कार्यालयात खेटे मारावे लागतात. अर्ज दाखल करणे, परवानगी घेणे यासरखया छोट्या मोठ्या कामांसाठी शासकीय कार्यालयात जाण्याची वेळच येऊ नये. ही कामे आॅनलाईन होतील, अशा सुधारणा शासनाने घडवून आणाव्यात. अशी अपेक्षा आहे. जागतिक स्तरावर प्रभाव कसा पडेल, या दृष्टीने विचार करून पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत. बंगळूरू, हैदराबाद या ठिकाणच्या तुलनेत हिंजवडी आयटी पार्कमध्ये आणखी पायाभूत सुविधांची गरज आहे. येथील आयटी पार्कच्या विस्तारास वाव आहे. त्या तुलनेत पायाभूत सुविधांना महत्व दिले गेले पाहिजे. हिंजवडीत आयटी क्षेत्राच्या विस्तारास वाव आहे. फेज ३ पूर्ण झाले आहे. पुढील टप्यात फेज चार आणि पाच विकसित होईल. या क्षेत्राचा विस्तार आणि विकास विचारात घेऊन सुधारणेच्या प्रक्रिेयेला गती दिली पाहिजे. या क्षेत्राचा वाढता पसारा तसेच त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा यामध्ये रस्ते आणि सुरक्षितता याला महत्त्व दिले पाहिजे.
- सुनील अडवाणी, व्यवस्थापन समिती सदस्य

Web Title: Infrastructure in 'IT City'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.