सणवारात महागाईचा वाढला तडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:26+5:302021-08-23T04:14:26+5:30
अभिजित कोळपे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : श्रावण महिन्यापासून विविध सणवारांना आपल्याकडे सुरुवात होते. मात्र, नेमकी याच काळात दरवर्षी ...

सणवारात महागाईचा वाढला तडका
अभिजित कोळपे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : श्रावण महिन्यापासून विविध सणवारांना आपल्याकडे सुरुवात होते. मात्र, नेमकी याच काळात दरवर्षी खाद्यतेल, भाजीपाला, फळभाज्यांचे भाव वाढत असतात. यंदा तर दरवाढीचा कहर झाला आहे. खाद्यतेलाचे दर दुप्पटीहून वाढले आहेत, तर गॅसचे दर महिन्याला वाढत आहे. गेल्या अडीच महिन्यांत गॅसचे दर ६०-६५ रुपयांनी (वर्षभरात २६०-२६५ रुपये) वाढले आहेत. सोबतीला साखर ४०-४२ किलोपर्यंत पाेहोचल्याने सर्वसामान्य कुटुंब मेटाकुटीला आले आहेत.
सध्या प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहे. तेल, साखर, गॅस या प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन गरजा आहेत. सोबतीला दैनंदिन भाजीपाला, फळभाज्या आवश्यक आहे. या सर्वांचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र, याबाबत राज्य असो की केंद्र सरकार दोघेही दुर्लक्ष करत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनमरणाचे त्यांना काही पडले नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया गृहिणी देत आहेत. या महागाईचा सर्वात जास्त फटका गृहिणींना बसत आहे. घरसंसार चालवताना अक्षरशा त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
--------
कोरोनाकाळात आमचे रोजगार गेले आहे. गॅसचे दर दर महिन्याला वाढत आहे. केंंद्र सरकारने सबसिडी बंद केली आहे. साथीला वर्षभरापासून तेलाचे दर दुप्पट झाले आहेत. त्यातच आता भाजीपालाचे दरही सातत्याने वाढत आहेत. गरिबांच्या जगण्या-मरण्याचा शासनाला काही घेणं-देणं नसल्याचे हे द्योतक आहे, असेच आम्हाला आता वाटायला लागले आहे.
- मोहिनी साबळे, गृहिणी
-----
होलसेल बाजारातील परिस्थिती वेगळी असते. मात्र, किरकोळ बाजारातील छोठे-मोठे व्यापारी पाऊस, मालाची आवक कमी असल्याचे सांगून प्रचंड भाववाढ करतात. वेगवेगळ्या कारणामुळे प्रत्येकाला होलसेल बाजारात जाऊन भाजीपाला खरेदी करता येत नाही. कोरोनामुळे वर्षभरापासून आर्थिक स्थिती बेताचीच झाली आहे. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. सर्वसामान्यांनी कसे जगायचे.
- नंदा ढवळे, गृहिणी
-----
१४ आणि १५ ऑगस्टला जोडून सुटी आल्याने मार्केट यार्डात दुसऱ्या दिवशी भाजीपाल्याची आवक दुप्पट झाली होती. तेव्हा दर निम्म्याने उतरल्याने चांगले दरही मिळू शकले नाहीत. आम्हाला व्यापाऱ्यांकडून अपेक्षित दर मिळत नाही. किरकोळ व्यापारी मात्र शहराच्या विविध भागांत घेतलेल्या भावापेक्षा दुप्पट-तिप्पट दराने मालाची विक्री करत आहेत. पिकवणाऱ्याचा उत्पादन आणि वाहतूकखर्चही निघत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती कधी बदलणार आहे.
- प्रताप कदम, शेतकरी
------
फळभाज्यांचे भाव पुढीलप्रमाणे (प्रतिकिलो)
वाण मार्केट यार्डातील दर इतर ठिकाणचे दर
वाटाणा ७०-७५ १००-१२०
गवार ४०-५० ६०-७५
वांगी १८-२२ ३५-४०
फ्लावर १२-१४ २०-२५
दोडका १०-१४ २२-२८
भेंडी १०-१६ २५-३०
चवळी १६-२० २०-३०
कोबी ४-६ २०-२५
टोमॅटो ६-८ १५-२५
काकडी ८-१० १५-२२
दुधी ५-८ १५-२०
कांदा १८-२२ २५-३०
बटाटा १०-१४ २०-२५
-----
...असे वाढले गॅसचे दर
महिना दर (रुपये)
ऑगस्ट २०२० ६१०
डिसेंबर २०२० ६६१
फेब्रुवारी २०२१ ७३८
एप्रिल २०२१ ८३१
मे २०२१ ८१२
ऑगस्ट २०२१ ८७५