भारतीय संशोधन अविश्वासाच्या जोखडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:29 IST2020-12-11T04:29:47+5:302020-12-11T04:29:47+5:30

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आयसीएमआर पासून पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रापर्यंत सर्व पातळ्यांवर आमचे संशोधन पत्रव्यवहाराव्दारे सुपूर्त केले ...

Indian research in the yoke of disbelief | भारतीय संशोधन अविश्वासाच्या जोखडात

भारतीय संशोधन अविश्वासाच्या जोखडात

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आयसीएमआर पासून पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रापर्यंत सर्व पातळ्यांवर आमचे संशोधन पत्रव्यवहाराव्दारे सुपूर्त केले होते. सर्व ठिकाणी निराशाच हाती आली. भारतात संशोधक कमी नसले तरी त्यांच्या संशोधनावर उद्योगांचा व संबंधित घटकांचा विश्वास बसत नाही, अशी खंत केंद्र शासनाच्या सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी पार्कचे मुख्य संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी व्यक्त केली. तथाकथित वैज्ञानिक, अंधश्रद्धा आणि अविश्वास या जोखडात भारतीय संशोधन अडकून पडल्याचेही त्यांनी सांगितले.

दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज, पुणे (डिकाई), अवनि आणि रिसर्च अ‍ॅन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन (रांचो) यांच्या वतीने सर सी.व्ही. रमण पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पी.ई. सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, डिकाई आणि रांचोचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ येमूल गुरूजी, पी.ई. सोसायटी, पुणेच्या उपसचिव आणि नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात, एसजीएम ग्रुपचे संचालक रमेश पाटील, बारामतीचे अतिरीक्त आयुक्त अधीक्षक मिलिंद मोहिते, राजेंद्र पाटील उपस्थित होते. ज्येष्ठ राष्ट्रीय संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर, ज्येष्ठ राष्ट्रीय संशोधक डॉ. विठ्ठल बांदल, दिव्यांगता सहायता केंद्राचे संशोधक व समन्वयक धनंजय भोळे, ज्येष्ठ राष्ट्रीय संशोधक व्ही.एम. कुलकर्णी आणि युवा संशोधक अंकिता नगरकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. जगदाळे म्हणाले, तथाकथित वैज्ञानिक, नोकरशहा आणि काही राजकीय नेतृत्व हेच भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनावर विश्वास ठेवत नसल्याने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शास्त्रज्ञ जे संशोधन करीत असतात त्यापासून समाज वंचित राहतो. मूळ भारतीय विद्यार्थी सिलीकॉन व्हॅलीत गेल्यानंतरच त्यांचे कर्तृत्व का सिद्ध होते हा आत्मचिंतनाचा विषय आहे. भारतात शास्त्रज्ञांना संशोधनाला पूरक सुविधा आणि वातावरण मिळत नाही. आयसर, आयआयटी यासारख्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमधून आपण केवळ पाश्चात्य देशांसाठी संशोधक तयार करीत आहोत. पीएचडी नंतर संशोधनाच्या संधी किंवा मार्ग उपलब्ध करून दिले नाहीत, तर भारतात रांचो कसे तयार होतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Indian research in the yoke of disbelief