भारतीय संस्कृती विश्वशांतीचे प्रतीक
By Admin | Updated: July 3, 2015 00:11 IST2015-07-03T00:11:34+5:302015-07-03T00:11:34+5:30
भारतीय संस्कृतीत विविधता असल्याने प्रत्येक गोष्टीतून जगण्याचा अर्थ सांगितलेला आहे. सत्य हेच जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असून मानवता धर्म अंगीकारण्याचा संदेश

भारतीय संस्कृती विश्वशांतीचे प्रतीक
लोणी काळभोर : भारतीय संस्कृतीत विविधता असल्याने प्रत्येक गोष्टीतून जगण्याचा अर्थ सांगितलेला आहे. सत्य हेच जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असून मानवता धर्म अंगीकारण्याचा संदेश या संस्कृतीने दिला आहे. सर्वांगाने समृद्ध असलेली ही संस्कृती, ज्ञान हे विश्वशांतीचे प्रतीक आहे, असे मत महायोगी गुरु श्री एम यांनी केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी पुणे, भारततर्फे विश्व-राजबाग लोणी काळभोर, पुणे येथे उभारण्यात आलेल्या दैवी ज्ञानाची अनुभूती देणाऱ्या भारतीय ‘संस्कृती-ज्ञान दर्शन’ केंद्राचे उद्घाटन महायोगी श्री एम यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी शिवचरित्रकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, ज्येष्ठ मुस्लिम विचारवंत हजरत शेख बियाबानी, निवृत्त लेफ्टनंट जनरल एम. ए. झाकी, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, डॉ. चंद्रकांत पांडव, प्रा. राहुल विश्वनाथ कराड, आदिनाथ मंगेशकर, प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. संजय उपाध्ये, ज्योती ढाकणे, स्वाती चाटे व प्रा. सुधीर राणे उपस्थित होते.
संगीत हाच माझा धर्म, कला ही माझी जात आणि शब्द या माझ्या संवेदना आहेत, असे हृदयनाथ मंगेशकर म्हणाले. या वेळी त्यांनी गायलेल्या भजनाने मंत्रमुग्ध केले. तर, बाबासाहेब पुरंदरे यांनी विश्वशांतीच्या या कार्याला आशीर्वाद देताना प्रेम हीच शांतता असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी डॉ. एस. एन. पठाण, हजरत बियाबानी, एम. ए. अहमद, डॉ. संजय उपाध्ये विचार मांडले.
स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती जगापुढे नेण्याचे मोठे कार्य केले. त्यांच्या कार्यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही कार्यरत आहोत. एकविसाव्या शतकात भारतभूमी जगासमोर ज्ञानाचे दालन म्हणून पुढे येईल. या विवेकानंदांच्या १८९७ मधील भाकिताप्रमाणे सध्या कार्य घडत आहे. महात्मा गांधी, विवेकानंद यांचा संदेश घेऊन श्री एम शांततेसाठी चालत आहेत आणि त्यांच्या हस्ते या ज्ञान दर्शन केंद्राचे उद्घाटन व्हावे, ही आनंदाची बाब आहे.’’
- प्रा. डॉ. विश्वनाथ कराड
लोकांमध्ये एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी ही पदयात्रा काढली आहे. कन्याकुमारीपासून सुरू केलेल्या या यात्रेने आतापर्यंत २,८०० किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे. अजून काश्मीरपर्यंत सुमारे ५ हजार किलोमीटर ही पदयात्रा होणार असून, माणसांना माणसाप्रमाणे जगू देण्याचा संदेश यामधून पोहोचवायचा आहे.’’
- श्री एम