मोठा गाजावाजा करून राजगुरूनगर शहरात मैला व सांडपाणी व्यवस्थेची पाइपलाइन शहरात टाकण्यात आली. परंतु यामुळे संपूर्ण शहरात मोठी बजबजपुरी निर्माण झाली आहे. रस्त्यांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत नागरिकांच्या समस्येवर लोकमतने प्रकाश टाकला आहे. याच स्वरूपाचे प्रकार शहरात वाडा रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ देखील झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, याविषयी बोलताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे धनंजय जगधने म्हणाले, संबंधित चेंबर हे दोन बाय तीन साईजचे असून हे चेंबर मुख्य रस्त्यावर न बसवता सेवा रस्त्याला अथवा गल्लीबोळात बसवावेत, असे प्रशासनाचे निर्देश आहेत. परंतु जेथे नाइलाज आहे तेथे, तसेच अरुंद रस्ते असल्यामुळे हे चेंबर रस्त्याच्या कडेला बसविण्यात आलेले आहे. शिवाय यावरून अवजड वाहने जाणे अपेक्षित नाही. तरीही ठेकेदाराला याबाबत माहिती देण्यात आली असून ज्या ठिकाणी अवजड वाहने जात असतील, अशा रस्त्यांवर चेंबरची भक्कम झाकणे, तसेच भक्कम स्वरूपाची चेंबर केले जावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.