कामे न केल्यास टोल भरणार नाही
By Admin | Updated: June 4, 2015 05:31 IST2015-06-04T05:31:30+5:302015-06-04T05:31:30+5:30
रखडलेल्या निगडी-देहूरोड दरम्यानच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत झालेल्या बैठकीत नागरिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले.

कामे न केल्यास टोल भरणार नाही
किवळे : रखडलेल्या निगडी-देहूरोड दरम्यानच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत झालेल्या बैठकीत नागरिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले. आयआरबीने चौपदरीकरण न करता गेल्या वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने टोलवसुली केली आहे, अपघात रोखण्यासाठी आयआरबीने येत्या ४ दिवसांत संरक्षक बाजूपट्ट्यांचे डांबरीकरण करावे, अन्यथा सोमवारपासून सोमाटणे टोलनाक्यावरील टोलवसुली बंद करण्यात येईल, असा इशारा देहूरोड येथे झालेल्या बैठकीत आमदार संजय भेगडे यांनी दिला.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून, त्याबाबत उपाययोजना करण्याबाबत बैठक झाली. या वेळी रस्ते
विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी संजय गांगुर्डे,
सल्लागार महेश जगदाळे, आय आयआरबीचे संपर्क अधिकारी
मदन गांधी, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पानसरे, पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे, बोर्डाचे उपाध्यक्ष ललित बालघरे, सदस्य विशाल खंडेलवाल, माजी उपाध्यक्ष अशोक शेलार, मदनलाल सोनिगरा, यदुनाथ डाखोरे, लहू शेलार, धर्मपाल तंतरपाळे, मिकी कोचर, कैलास पानसरे, बाळासाहेब शेलार, बाळासाहेब जाधव, डॉ. शालक आगरवाल, धनराज शिंदे, सीताराम चौरे आदी उपस्थित होते.
आमदार भेगडे म्हणाले, ‘‘निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले नसताना आयआरबी कंपनी सोमाटणे येथील नाक्यावर टोलवसुली करीत आहे. याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. चुकीच्या पद्धतीने टोलवसुली होत आहे. या रस्त्यावरील टोल कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.’’
माजी उपाध्यक्ष अशोक शेलार म्हणाले, ‘‘सेवा रस्त्यासाठी जागा उपलब्ध होणार नाही, त्या
दृष्टीने उड्डाणपूल उभारताना महामंडळाने दक्षता घेण्याची गरज आहे. रुंदीकरणाचे काम लवकर सुरू करून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करावी. ’’(वार्ताहर)