प्रश्न प्रलंबित ठेवल्यास खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:29 IST2021-02-20T04:29:01+5:302021-02-20T04:29:01+5:30

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत : ९२० अर्जांपैकी ७५० अर्ज निकाली काढले पुणे : राज्याच्या उच्च व ...

If the question is pending, it will not be tolerated | प्रश्न प्रलंबित ठेवल्यास खपवून घेणार नाही

प्रश्न प्रलंबित ठेवल्यास खपवून घेणार नाही

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत : ९२० अर्जांपैकी ७५० अर्ज निकाली काढले

पुणे : राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ पुणे’ या उपक्रमांतर्गत ९२० अर्जांपैकी ७५० अर्ज निकाली काढले. तर, राज्यात आत्तापर्यंत एकूण ४ हजार ४११ अर्जांपैकी ४ हजार ५३ अर्जांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. तसेच आवश्यकता भासल्यास विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर-कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी असे उपक्रम पुन्हा घेतले जाईल. परंतु, विद्यार्थी व इतर घटकांचे प्रश्न शिक्षण विभागातील अधिकारी विनाकारण प्रलंबित ठेवत असतील, तर ते राज्य शासनाकडून कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी दिला.

राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे विविध विद्यापीठांमध्ये ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ या उपक्रमांतर्गत विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविले जात आहेत. शिक्षण विभागाने या उपक्रमात प्रश्न सोडविण्यासाठी सर्व घटकांकडून ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविले होते. प्राप्त अर्जांमधून तीन कर्मचाऱ्यांना तत्काळ अनुकंपाखाली नियुक्ती देण्यात आली. वैद्यकीय प्रतिपूर्तीचे पुण्यातील १२ नाशिक मधील ८ आणि आणि अहमदनगर जिल्ह्यातील ४ आदेश वितरित केले. तसेच अनेक कर्मचा-यांचा भविष्य निवाहन निधीचा प्रश्न सोडविण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यार्थी, प्राचार्य व शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी सकारात्मक सोडविण्याचा प्रयत्न केला.

----

विद्यापीठाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम ज्या सभामंडपात झाला त्याच ठिकाणी ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ पुणे’ हा कार्यक्रम घेतला. त्यामुळे विद्यापीठावर इतर अतिरिक्त खर्चाचा भर पडला नाही.मुंबई विद्यापीठाचे प्रश्न सोडविण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमाच्या सभागृहाच्या खर्चाच्या भाड्याची रक्कम माझ्या आमदार निधीतून भरण्यात आली आहे. त्यामुळे या उपक्रमाच्या खर्चाचा भार कोणत्याही विद्यापीठावर पडत नाही. कोणतीही माहिती न घेता विनाकारण या चांगल्या उपक्रमावर टीका करणे योग्य नाही, असेही सामंत यांनी सांगितले.

---

अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अभ्यासक्रम दोहा-कतार येथे सुरू करण्यासाठी आवश्यक करार केला आहे. मात्र, राज्याच्या शिक्षण विभागाकडून त्यास मान्यता देण्यास विलंब झाला होता. परंतु, गुरूवारी मंत्री उदय सामंत यांनी शासनाकडून या केंद्रास मान्यता दिल्याची गुरूवारी घोषणा केली. परतु,यापूर्वी सूचना देवूनही शासकीय अधिकाऱ्यांनी मान्यता न दिल्यामुळे सामंत यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

--

बालेवाडी येथे १० कोटी खर्चून उपकेंद्र उभारणार

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्रांचा विस्तार जातातील प्रमुख शहरांमध्ये केला जाणार आहे. त्यासाठी पुण्यात बालेवाडी येथे १० कोटी रुपये खर्च करून उपकेंद्र उभारले जाणार आहे. पुण्यासह औरंगाबाद, रत्नागिरी आणि नांदेड या ठिकाणी सुध्दा उपक्रेंद्रांचा विस्तार करण्यात येईल. तसेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे उपक्रेंद्र पुणे, रत्नागिरी, नांदेड व औरंगाबाद येथे स्थापन केले जाणार आहे.

Web Title: If the question is pending, it will not be tolerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.