उच्चदाब विद्युत तारांखाली घरे
By Admin | Updated: December 19, 2014 01:57 IST2014-12-19T01:57:48+5:302014-12-19T01:57:48+5:30
नियमानुसार उच्चदाब विद्युत मनोऱ्यांपासून दोन्ही बाजूस साडेआठ मीटर जागा सोडून बांधकाम करावे लागते. परंतु आधीच अनधिकृत बांधकामांना ऊत आला

उच्चदाब विद्युत तारांखाली घरे
नीलेश जंगम ल्ल पिंपरी
अति उच्च दाब वाहिन्यांच्या आजूबाजूला घरे उभारून हजारो नागरिक मृत्यूच्या छत्रछायेत राहत आहेत. वादळी वारा, पावसाळ्यात या वाहिन्या तुटल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी स्थिती मोरेवस्ती-चिखली परिसरात निर्माण झाली आहे.
नियमानुसार उच्चदाब विद्युत मनोऱ्यांपासून दोन्ही बाजूस साडेआठ मीटर जागा सोडून बांधकाम करावे लागते. परंतु आधीच अनधिकृत बांधकामांना ऊत आला असताना यात भर म्हणजे मनोऱ्याच्या बाजूला मनोऱ्यावरील उच्चदाब विद्युत वाहिनीखाली लोकांनी घरे बांधली आहेत. घराच्या छतावर पत्रा असल्याने धोकादायक परिस्थिती आहे.
शिवरकर चौक ते साने चौक या विकसित आराखड्यातील २४ मीटर रस्त्याला आणि अष्टविनायक चौक ते चिखली-आकुर्डी या १८ मीटर चिंचेचा मळा रस्त्यावरुन विद्युत मनोऱ्याची रांग गेली आहे. वाहिन्यांची रांग गेल्याने त्या वेळी शेतकऱ्यांना मोबदला देऊन जागेचा ताबा घेण्यात आला. या मनोऱ्याच्या रांगेच्या दोन्ही बाजूला ८०० ते १२०० मीटर लांबीच्या बसक्या घरांच्या सोसायट्या, गल्ल्या आहेत. संतकृपा हौसिंग सोसायटी ते श्री गणेश कॉलनीपर्यंत जवळपास ५० सोसायट्या आहेत. या सर्व सोसायट्यांतील रहिवाशांची संख्या सुमारे ४० हजार इतकी आहे. लांबच लांब सोसायटीच्या गल्ल्या असल्याने मनोऱ्यांच्या रांगेखाली रस्ता तयार करण्यात आला. यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटला; परंतु त्यालगत बांधकाम करीत लोकांनी जोखीम पत्करली आहे.
मनोऱ्यांच्या खालून जाणारा रस्ता काही ठिकाणी २५ फुटी, ३० फुटी, तर काही ठिकाणी ५० फुटांइतका आहे. रस्ता झाल्याने वर्दळ वाढू लागली आहे. रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांनी उत्पन्नाचे साधन म्हणून रस्त्याच्या बाजूची भिंत पाडून त्या ठिकाणी शटर बसविले आहे. चार पत्रे टाकून दुकाने थाटली. काही लोक स्वत: दुकान चालवतात, तर काहींनी भाड्याने दिली आहेत. काही लोकांनी तर घराच्या बाजूला तिन्ही बाजूने पत्रे ठोकून वरुन पत्र्याचे छत तयार करून दुकाने थाटली आहेत. यामुळे रस्त्याची रुंदी कमी-जास्त होत गेली. बांगड्या, चप्पल, किराणा, केश कर्तनालय, मोबाइल, भाजीविक्री, इस्त्री, स्टेशनरी, पानटपरी, डेअरी, लेडीज शॉपी, पार्लर अशा स्वरूपाची ३०० हून अधिक दुकाने या रस्त्यालगत मनोऱ्यांच्या तारांच्या खालीच थाटली आहेत. पावसाळ्यात येथे दुकानाच्या पत्र्यांमध्ये वीज प्रवाह असतो. छत्री घेऊन चाललेल्या व्यक्तीच्या छत्रीला सुद्धा विजेचा धक्का बसतो.
इतकी धोकादायक परिस्थिती असतानाही थोडेफार पैसे कमविण्याच्या लालसेपोटी लोकांनी स्वत:चा जीवही धोक्यात घातला आहे.