...तो ‘अनमोल’ ठेवा गमावला
By Admin | Updated: March 28, 2015 01:03 IST2015-03-28T01:03:13+5:302015-03-28T01:03:13+5:30
महाकवी ग. दि. माडगूळकर आणि बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेली ‘गीतरामायण’ ही अजरामर कलाकृती साहित्यासह सांगीतिक विश्वात मैलाचा दगड ठरली.

...तो ‘अनमोल’ ठेवा गमावला
पुणे : महाकवी ग. दि. माडगूळकर आणि बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेली ‘गीतरामायण’ ही अजरामर कलाकृती साहित्यासह सांगीतिक विश्वात मैलाचा दगड ठरली. गीतरामायणातील प्रत्येक रचना ज्या नोटेशनवर बांधली गेली, त्या गीतांच्या सर्व नोटेशन एका वहीमध्ये लिहून ठेवण्याचा माझा शिरस्ता होता. मात्र, त्याचे ‘मूल्य’ न समजल्याने त्या वह्या अनवधानाने रद्दीमध्ये टाकल्या गेल्या. त्यामुळे एका उत्तुंग कलाकृतीचा अनमोल ठेवा गमाविल्याची सल आजही मनात असल्याची खंत ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांनी व्यक्त केली.
शनिवारी रामनवमीच्या दिवशी गीतरामायणाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त साधलेल्या संवादातून जोग यांनी गीतरामायणातील प्रत्येक रचनेच्या आठवणींचा कप्पा ‘लोकमत’शी बोलताना उलगडला. संगीतात कोणताही जडपणा जाणवू न देणे, अर्थपूर्ण चाली देणे ही बाबूजींची खासियत होती. ‘चला राघवा चला’ हे गीत स्वरबद्ध करण्यासाठी बाबूजींना वेळ मिळाला नसल्याने ते संगीतबद्ध करण्याचे शिवधनुष्य कसे पेलले याची आठवण त्यांनी सांगितली.
सुधीर फडके यांची मुंबईला केस चालली होती, त्यामुळे त्यांना गाणे संगीतबद्ध करण्यास वेळ नव्हता, तेव्हा तुम्ही हे गाणे कराल का? अशी विचारणा त्यांनी केली. संपूर्ण गाणं करणे हे माझ्यासाठी आव्हान होते, पण ते मी स्वीकारले. रेकॉर्डिंगच्या वेळी बाबूजी आले. गाणे ऐकून कसं वाटतंय सांगा, असे त्यांना म्हटले, ते गाणे बिहाग रागात बांधले होते.
गदिमांकडून गाणे घेऊन येणे ही जबाबदारी माझ्यावर असायची. पंचवटीला गेल्यावर, ‘तू जरा बस’ असे म्हणून केवळ पंधरा मिनिटांत ते गाणे कागदावर उमटवीत असत. एकटाकी लेखन काय असते हे त्यांच्याकडे पाहून उमगायचे. बाबूजींची प्रतिभाही त्याच तोडीची. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गाणे त्यांनी दरबारी कानडात बसविले होते; मात्र त्याला दु:खी छटा येत असल्यामुळे त्यांना ती चाल आवडली नव्हती. गाणे रेकॉर्डिंग होणार होते, तरीही अंतरे केवळ डोक्यात ठेवून त्यांनी गाणे रेकॉर्ड केले. असा अलौकिक संगीतकार आणि गायक पाहिला नसल्याचे ते म्हणाले.
(प्रतिनिधी)
४ वसंत बहार रागातील ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा’ हे गीत बसविण्यासाठी बाबूजींकडे गेलो होतो. तिथे पेटीवर या गीताचा कागद ठेवला होता. त्या गीताचे शब्द वाचल्यानंतर डोक्यात एकदम चाल घोळायला लागली. काही सुचतंय का? असे बाबूजींनी विचारले. त्यांना अस्थाई ऐकवली, खूप छान आहे असा हिरवा कंदील त्यांनी दिला आणि ‘अस्थाई’ माझी झाली, हे सांगताना जोग यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव नकळतपणे उमटले.