लवकर निदानातून जिंकता येईल अर्धी लढाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST2021-02-05T05:02:00+5:302021-02-05T05:02:00+5:30

पुणे : कर्करोग बरा होत नाही किंवा त्यावर उपचार उपलब्ध नाही, अशी भ्रामक समजूत समाजात आजही आहे. जगभरात कर्करोगाचे ...

Half the battle can be won with early diagnosis! | लवकर निदानातून जिंकता येईल अर्धी लढाई!

लवकर निदानातून जिंकता येईल अर्धी लढाई!

पुणे : कर्करोग बरा होत नाही किंवा त्यावर उपचार उपलब्ध नाही, अशी भ्रामक समजूत समाजात आजही आहे. जगभरात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आजाराबद्दलची भीती, उपचारांबद्दलच्या माहितीचा अभाव आणि उशिरा होणारे निदान हे मोठे अडथळे ठरत आहेत. कर्करोगाचे लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल सातत्याने जनजागृती झाल्यास गुंतागुंत टाळता येऊ शकते. बायोप्सीप्रमाणेच आता रक्ताच्या तपासणीतूनही कर्करोगाचे निदान शक्य झाले आहे.

कर्करोगाच्या शारीरिक परिणामांपेक्षा मानसिक परिणाम जास्त भयानक असतात. कर्करोगाचे निदान झाले म्हणजे आता फार दिवसांचे आयुष्य राहिले नाही, असा ग्रह रुग्णांच्या मनात तयार होतो. उपचारांपूर्वीच रुग्ण अर्धे खचलेले असतात, नातेवाईकही हतबल झालेले असतात. मात्र, कर्करोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास आणि लवकरात लवकर निदान झाल्यास उपचारांचा कालावधी आणि खर्चही कमी होतो. त्याचप्रमाणे, रुग्ण कॅन्सरमुक्त होऊन निरोगी आयुष्य जगू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार पेशी विभाजनाचा वेग हेच कॅन्सरमागील मुख्य कारण आहे. हा वेग प्रमाणापेक्षा जास्त वाढतो, त्या वेळी शरीरातील नको असणाऱ्या पेशी म्हणजेच डेड सेल्स वाढतात. त्याच एका ठिकाणी पुंजका होऊन कॅन्सरची गाठ तयार होते. गाठ छोटी असताना निदान झाल्यास साधे उपचार किंवा छोट्या शस्त्रक्रियेने कॅन्सरचा समूळ नाश करता येतो. गाठ मोठी असेल तर जास्त उपचार, मोठी शस्त्रक्रिया किंवा एकापेक्षा अधिक शस्त्रक्रिया कराव्या लागतात. त्यामुळेच लवकर निदान म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखे आहे, असे वैद्यकतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

---

कॅन्सरचा सामना करताना मानसिक कणखरता आवश्यक असते. शेवटच्या टप्प्यात निदान झाल्यास नैैराश्य येते, त्यामुळे रुग्ण उपचारांसाठी पुढे येत नाहीत. उपचार सुरु केले तरी त्यात सातत्य नसते. लवकर निदान झाल्यास उपचारांचा कालावधी कमी असतो. तीन किंवा सहा महिने उपचार घेऊन रुग्ण कायमचा बरा होऊ शकतो. शेवटच्या टप्प्यात निदान झाल्यास आयुष्यभर उपचार सुरू ठेवावे लागतात. त्यामुळेच प्रतिबंधात्मक तपासण्या, मूलभूत चाचण्या वेळेवर करुन घ्याव्यात. कर्करोगाबाबत अवास्तव भीती असल्याने आणि जागरुकता नसल्याने लवकर निदान होत नाही. त्यामुळे आपण बरे होणार नाही, ही भीती मनातून हद्दपार करायला हवी.

- डॉ. मिनिष जैैन, कॅन्सर सर्जन, नोबल हॉस्पिटल

--

कॅन्सरची गाठ छोटी असते, तेव्हा उपचार करणे सोपे असते. गाठ वाढली की उपचार अवघड होतात. वेगवेगळ्या प्र्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. हाडांच्या कॅन्सरबाबत जनजागृती आवश्यक आहे. हाडांमधील दुखापत, वेदना दोन आठवड्यांपेक्षा जास्त होत राहिल्यास कॅन्सरची चाचणी करुन घेतली पाहिजे. आजकाल उपलब्ध असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन लवकर निदान आणि उपचार शक्य आहेत.

- डॉ. योगेश पंचवाघ, ऑर्थोपेडिक ऑनकोलॉजिस्ट

---

कॅन्सर होऊ नये म्हणून काय करता येईल, याचे सर्वात मोठे उत्तर म्हणजे निसर्गातील क्लोरोफिल. या घटकांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण चांगले असते. दररोजच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात क्लोरोफिल असेल तर कॅन्सरला प्रतिबंध करता येतो. गाय व्यायल्यानंतर येणारा पहिला चिक, हळद हे घटक कॅन्सर होऊ नये म्हणून किंवा कॅन्सर झाल्यानंतरही तो वाढू नये यासाठी अत्यंत उपायकारक असतो हे सिद्ध झाले आहे. कॅन्सर वेगवेगळ्या अवयवांमध्ये होत असले तरी त्याचे मूळ कारण हे आपल्या सदोष जीवनशैलीमध्ये आहे. त्यामुळे संतुलित आहार, विहार आणि विचार हीच कर्करोगाच्या कचाट्यातून सुटण्याची खरी गुरुकिल्ली आहे.

- डॉ. पी. एन. कदम, संचालक, संकल्प संस्था

Web Title: Half the battle can be won with early diagnosis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.