निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना घेराव
By Admin | Updated: February 4, 2017 03:54 IST2017-02-04T03:54:56+5:302017-02-04T03:54:56+5:30
समन्वय व परस्पर सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याने निवडणूकीचे कामकाज पहाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना घेराव
इंदापूर : समन्वय व परस्पर सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याने निवडणूकीचे कामकाज पहाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांबद्दल असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी या सर्वांनी कामकाज बंद करुन त्यांना घेराव घातला होता.
या संदर्भात राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रारी अर्जही पाठवण्यात आला आहे. आम्ही निवडणूकीसंदभार्तील सर्व कामे कसला ही हलगर्जीपणा न करता प्रामाणिकपणे करत आहोत. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आम्हाला जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक देत आहेत. आम्ही गुलाम असल्याप्रमाणे हीन व तुच्छतेची भाषा वापरत आहेत. हे प्रकार वारंवार होतं असल्याने आमचे मनोधैर्य व काम करण्याची मानसिकता पूर्णपणे ढासळली आहे, असे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या हाताखाली काम करण्याची आमची मानसिकता नाही.तरी निवेदनाची दखल घेवून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. निवेदनाखाली गटविकास अधिकारी माणीकराव बिचकुले, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. लहू वडापूरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, क्षेत्रीय कृषी अधिकारी प्रवीण जाधव, भूमी अभिलेख विभागाचे तालुका निरीक्षक नरेंद्र झांबरे यांच्यासह ४३ जणांच्या सह्या आहेत. या संदर्भात प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम म्हणाले, की निवडणूकीचे कामकाज पहाण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी स्वत:ची गैरसमजूत करून घेतली आहे. निवडणूक कामकाजासंदर्भात वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या बैठकांना यातील बरेच जण येत नाहीत.आले तर वेळेवर येत नाहीत. निवडणूका सारख्या येत नाहीत.त्यामुळे त्यांच्या कामास प्राधान्य दिले गेले पाहीजे. मात्र तसे केले जात नाही. या सर्वांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला असता, वरील कुभांड रचण्यात आले आहे.
(वार्ताहर)