जिल्ह्यात विविध उपक्रमांनी अभिवादन
By Admin | Updated: April 11, 2015 22:52 IST2015-04-11T22:52:22+5:302015-04-11T22:52:22+5:30
महात्मा जोतिबा फुले यांचे विचार जतन करणे ही काळाची गरज आहे, असे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात विविध उपक्रमांनी अभिवादन
राहू : महात्मा जोतिबा फुले यांचे विचार जतन करणे ही काळाची गरज आहे, असे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.
राहू येथील सावतामहाराज कार्यालयामध्ये महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीचे आयोजन सावतामहाराज ट्रस्ट राहू व समस्त ग्रामस्थ राहू यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी शैक्षणिक दालन सुरू केले, की ज्यामुळे महिला देशामध्ये विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य निर्माण करीत आहेत. शेतकऱ्यांची मुले शिकली पाहिजेत, ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतीव्यवसायामध्ये आधुनिकता आणून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारता येईल हा मोठा हेतू त्या पाठीमागे होता.
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे कार्याध्यक्ष पांडुरंग राऊत म्हणाले, की सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणारे समाजसुधारक जोतिबा फुले यांनी अस्पृश्य व दीनदुबळ्यांसाठी काम केले. असेच समाजसुधारक देशात जन्माला आले पाहिजेत, की ज्यामुळे या देशातील जातिभेद समूळ बाजूला टाकता येईल.
या वेळी राहुल कुल यांच्या आमदार फंडातून तसेच जिल्हा परिषद सदस्य बंडू नवले व पंचायत समिती सदस्य किसन शिंदे या तिघांच्या फंडातून उभारण्यात येणाऱ्या चार हजार स्क्वेअर फूट सभामंडपाचे भूमिपूजन कुल यांच्या हस्ते करण्यात आले.
या सभामंडपासाठी ५० लाखांच्या जवळपास रक्कम खर्च करून होत आहे. तसेच, सावतामहाराज कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ व कमानीचे बांधकामाचा खर्च उपसरपंच सुरेश शिंदे यांनी दिला असून, या कमानीचे भूमिपूजन श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
जयंतीनिमित्त लोकमान्य हॉस्पिटल राहूच्या वतीने सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शंभरच्या जवळपास रुग्णांची या वेळी तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले, तर नेत्ररुग्णांसाठी चष्मेवाटप करण्यात आले.
या वेळी वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरीव कामकाज केल्याबद्दल डॉ. डाके यांना ट्रस्टच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या वेळी शिवाजी सोनवणे, महेश भागवत, बबन लव्हे, जालिंदर शिंदे, बाळासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. नामदेव बारवकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशाली आबणे, संजय इनामके, प्रकाश भागवत, राहूच्या सरपंच मनीषा नवले, बापूसाहेब मेहेर, मोहन म्हेत्रे, उपसरपंच सुरेश शिंदे, पोपटराव बोराटे, महेंद्र रासकर, भाऊ चव्हाण, हनुमंत भागवत, सरपंच ज्योती जाधव, बळवंत डुबे, दत्तोबा डुबे, संदीप खेडेकर, डॉ. प्रताप वळसे उपस्थित होते.
इंदापुरात पुतळ्यास पुष्पहार अर्पण
इंदापूर : महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर नगरपालिकेच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, उपनगराध्यक्ष भरत शहा, मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, अॅड. गिरीश शहा, प्रा. कृष्णा ताटे, पांडुरंग शिंदे, राजकुमार राऊत उपस्थित होते.
सुप्यात महात्मा फुले जयंती उत्साहात
सुपे : येथील सावतामहाराज मंदिरामध्ये महात्मा जोतिबा फुले यांची १८८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
खानवडी (ता. पुरंदर) येथून आणलेल्या ज्योतीचे स्वागत ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंगल कौले, दादा पाटील, शफिक बागवान, शौकत कोतवाल, बी. के. हिरवे, महादेव जगताप, अनिल हिरवे, बापू चोरमले, बाळासाहेब बारवकर, अमोल बारवकर, ज्ञानेश्वर कौले, संजय बारवकर, संतोष लोणकर, अशोक लोणकर उपस्थित होते.
शुक्रवारी (दि. १०) रात्री आठ वाजता नागेश गवळी यांच्या ‘महात्मा फुले यांचे विचार आणि आजचा महाराष्ट्र’ या विषयाचे व्याख्यान आयोजित केले होते. प्रास्ताविक जयराम सुपेकर यांनी केले. अशोक लोणकर यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब हिरवे व सचिन भुजबळ यांनी स्वागत, तर सुदाम नेवसे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
बेल्ह्यात विविध कार्यक्रमांतून अभिवादन
४बेल्हा : येथे आज महात्मा फुले जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १, २ च्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापक तुकाराम पोटे, फिरोज इनामदार, जिल्हा परिषद शाळा नंबर २ चे मुख्याध्यापक अनिल शिंदे, बोऱ्हाडे गुरुजी, सर्व शिक्षक उपस्थित होते.
४जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध उपक्रमांद्वारे महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुरंदर येथून वाजतगाजत ज्योत आणली. यामध्ये लहान मुले तसेच महिला, पुरुषांचा सहभाग लक्षणीय होता.