घास हिरावू देणार नाही
By Admin | Updated: August 11, 2014 03:57 IST2014-08-11T03:57:17+5:302014-08-11T03:57:17+5:30
राज्यघटनेने आदिवासी घटकास दिलेल्या आरक्षणावर अतिक्रमण करण्यासाठी धनगर समाज संघटनांकडून दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे

घास हिरावू देणार नाही
पिंपरी : राज्यघटनेने आदिवासी घटकास दिलेल्या आरक्षणावर अतिक्रमण करण्यासाठी धनगर समाज संघटनांकडून दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे. त्यांची ही कृती घटनाबाह्य असून, त्या विरोधात आदिवासी विकास परिषदेच्या वतीने कासारवाडी ते पिंपरीपर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी समाजबांधव सहभागी झाले होते. पिंपरीत झालेल्या जाहीर सभेत आमच्या ताटातला घास हिरावून घेऊ देणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ धडक मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी पुणे महापालिकेच्या नगरसेविका रोहिणी चिमटे, नामदेव गंभीरे, विजय आढारी, दादाभाऊ गबाड, पांडुरंग कचरे, देवानंद निळक, तसेच नगरसेवक रामदास बोकड, शकुंतला धराडे, आशा सुपे, भाऊसाहेब सुपे यांच्यासह अनेक आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, आदिवासी समाजबांधव उपस्थित होते. कासारवाडी ते पिंपरीपर्यंतच्या धडक मोर्चात आदिवासी महासंघ, आदिवासी समाज कृती समिती,महाराष्ट्र आदिवासी सेवा संघ,हुतात्मा नाग्या कातकरी आदिवासी संघटना, आदिवासी सह्याद्री तरूण मंडळ, पडकई प्रतिष्ठान, गोंडवाना समाज संघटना,परधान समाज संघटना, नवजीवन आदिवासी संघटना, पीएमपी आदिवासी कर्मचारी संघटना, हिंदू महादेव कोळी धर्मशाळा कळमजादेवी महिला मंडळ आदी आदिवासी समाज संघटना आणि संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या सभेत नगरसेविका आशा सुपे म्हणाल्या, ‘‘धनगर समाजाला शासनाने यापूर्वीच साडेतीन टक्के आरक्षण दिले आहे, तरीही हा समाज आदिवासी बांधवांच्या आरक्षणात वाटेकरी होण्याचा प्रयत्न करीत आहे. धनगर ही आदिवासी जमात आहे असे सांगून आमच्या ताटातला घास आम्ही देणार नाही.’’
बोकड म्हणाले, ‘‘खरे आदिवासी आहोत, हे सांगण्याची आम्हाला गरज नाही. आमच्या समाजावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी सरकारने स्वीकारावी.’’
पांडुरंग कचरे म्हणाले की, हिंसक मार्गाने कोणी आरक्षण घेणार
असेल, तर आदिवासी समाज गप्प बसणार नाही. आदिवासी समाजही पेटून उठेल. (प्रतिनिधी)