ग्रामपंचायत निवडणुकाही होणार प्रतिष्ठेच्या
By Admin | Updated: June 30, 2015 23:10 IST2015-06-30T23:10:14+5:302015-06-30T23:10:14+5:30
इंदापूर तालुक्यामध्ये आॅगस्ट महिन्यात ६२ ग्रामपंचयातींच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे गावागावांतील वातावरणात आतापासूनच राजकीय रंग भरू लागला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकाही होणार प्रतिष्ठेच्या
पळसदेव : इंदापूर तालुक्यामध्ये आॅगस्ट महिन्यात ६२ ग्रामपंचयातींच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे गावागावांतील वातावरणात आतापासूनच राजकीय रंग भरू लागला आहे. पक्षविरहित पॅनल
होत असताना राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, याचा प्रत्यय येत आहे. तसेच, ग्रामपंचायत निवडणुकादेखील आता प्रतिष्ठेचा विषय ठरत असल्याने अनेक बड्या नेत्यांकडे पॅनलच्या बैठका
झडत आहेत.
इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीपासून विविध सहकारी संस्था असो वा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असोत, त्या चुरशीच्याच होतात. पक्षापक्षांतील तालुकास्तरीय नेत्यांचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांवरच आगामी काळातील राजकीय गणिते ठरतात. त्यामुळे या निवडणुकांनाही आता महत्त्व प्राप्त झाले आहे.
तालुक्यात निवडणुका होत असलेल्या ६२ ग्रामपंचायतींमध्ये अनेक मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे आतापासूनच उमेदवार कोण निवडायचे, विरोधी पॅनलचे उमेदवार कोण असतील, याबाबतची चाचपणी सुरू आहे.
सत्ताधारी असणाऱ्यांची आता जिरवायची, असाही विरोधातील सूर अनेक गावांमध्ये उमटताना दिसत आहे. तसेच, या वेळी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ज्या पॅनलमधून हमखास निवडून येण्याची शाश्वती आहे, त्या पॅनलमधून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांकडून लॉबिंग करण्यात येत आहे. तर, काहींनी मतदारांना अकर्षित करण्यासाठी जेवणावळी सुरू केल्या आहेत. विविध प्रलोभनेही दाखवली जात आहेत.
तालुक्यामध्ये भादलवाडी, अकोले, पोंधवडी, पिंपळे, शेटफळगढे, निरगुढे, सणसर, लासुर्णे, पळसदेव, वालचंदनगर, कळस, रुई, अंथुर्णे, निमगाव केतकी, भरणेवाडी या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. (वार्ताहर)