गुळाणीतून बेसुमार पाणीउपसा
By Admin | Updated: June 9, 2015 05:16 IST2015-06-09T05:16:22+5:302015-06-09T05:16:22+5:30
गुळाणी (ता.खेड) येथील जनतेला सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

गुळाणीतून बेसुमार पाणीउपसा
वाफगाव : गुळाणी (ता.खेड) येथील जनतेला सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहेत. या गावात नळपाणी पुरवठ्याची नवीन योजना मागील वर्षीच पूर्ण झाली. त्यासाठीची विहिर देखील पाझर तलावामध्येच आहे. तरी देखील विहिरीत पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत.
गुळाणी येथे १९९७ साली छोटे पाटबंधारे विभागामार्फत पाझर तलावाचे काम सुरू झाले व २००५ मध्ये पूर्ण करण्यात आले. परंतु, अद्यापही पाझर तलावाची दप्तरी नोंद झालेली नाही. अजूनही ७/१२ वर मुळ खातेदारांचीच नावे आढळतात. या तलावातून शेतीसाठी पाणी उपसण्याची कुणालाही परवानगी नाही. तरीही स्थानिक शेतकरी कुणालाही न जुमानता तलावातून इलेक्ट्रीक मोटार, इंजिन आदींच्या सहाय्याने राजरोसपणे पाणी उपसतात. त्यामुळे हा पाझर तलाव गेल्या दोन महिन्यांपासून कोरडा पडला आहे. म्हणून गुळाणी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे.
पाणी उपसा करणा-यांना गुळाणी ग्रामपंचायतीने वारंवार सांगूनही त्यांनी पाण्याचा उपसा बंद न केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. गुळाणी ग्रामपंचायतीने तलावातील पाणी उपसा बंद करण्याबाबत तहसिल कार्यालयाशी पत्रव्यवहार करूनही संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले. (वार्ताहर)
४गुळाणी तलावातून शेतीसाठी पाणी उपसण्याची कुणालाही परवानगी नाही. तरीही स्थानिक शेतकरी कुणालाही न जुमानता तलावातून इलेक्ट्रीक मोटार, इंजिन आदींच्या सहाय्याने राजरोसपणे पाणी
उपसतात.
४गुळाणी ग्रामस्थांना सध्या पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दर दर वर्षी शेतीसाठी या तलावातून बेसुमार पाणी उपसा होत आहे. यावर नियंत्रण येण्यासाठी पाझर तलावाची नोंद ७/१२ वर व्हावी व शासनाचे नियंत्रण असावे, अशी मागणी होत आहे.