मंडपांसाठी परवानगी घ्या!
By Admin | Updated: September 14, 2015 04:50 IST2015-09-14T04:50:41+5:302015-09-14T04:50:41+5:30
गणेशोत्सव, ईद, दहीहंडी, नवरात्र, सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता रस्त्यांवर मंडप टाकायचा असेल तर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे.

मंडपांसाठी परवानगी घ्या!
दीपक जाधव, पुणे
गणेशोत्सव, ईद, दहीहंडी, नवरात्र, सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता रस्त्यांवर मंडप टाकायचा असेल तर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या ५ वर्षांतील आकडेवारीनुसार वर्षाला केवळ ८५ ते ९० मंडळांकडून परवानगी घेतली जात असल्याचे माहिती अधिकारामध्ये उजेडात आले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यंदा नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याने मंडळांनी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उत्सवाच्या काळांमध्ये रस्त्यावर बेकायदेशीरपणे व नियमांचे पालन न करता उभारल्या जाणाऱ्या मंडपांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत असल्याची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने मंडप उभारण्याबाबत काटेकोर नियमावली ठरवून देण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. पुणे महापालिकांकडून त्यानुसार नियमावली तयार करण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तोपर्यंत यंदा गणेश मंडळांना जुन्या नियमावलीनुसार परवानगी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, जुन्या नियमावलीनुसार मंडपांसाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून परवानगीच घेतली जात नसल्याचे उजेडात आले आहे.
शहरामध्ये शेकडो गणेशोत्सव, नवरात्र उत्सव मंडळे आहेत. त्याचबरोबर ईद, दहीहंडी व इतर सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. या सर्व कार्यक्रमांसाठी रस्त्यावरच मंडप उभारले जातात. मात्र, त्यातील बहुतांश मंडळे परवानगीच घेतली जात नसल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. रस्त्यांवर मंडप टाकण्यासाठी २००९ ते आॅगस्ट २०१५ या कालावधीमध्ये किती जणांनी परवानगी घेतली याची माहिती लोकहित फाऊंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी मागितली होती. त्यामध्ये गेल्या ७ वर्षांत केवळ ४८० जणांनी मंडप टाकण्यासाठी रीतसर परवानगी घेतल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. २००१ मध्ये ९०, २०१२ मध्ये ६०, २०१३ मध्ये ८०, २०१४ मध्ये ८८, २०१५ (आॅगस्टपर्यंत) ४७ मंडळे, संस्थांनी परवानगी घेतल्याची माहिती उजेडात आली आहे. उच्च न्यायालयाने रस्त्याच्या किमान एक तृतीयांश जागेवरच मंडप उभारण्यात यावा, आठ फूट किंवा त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावर मंडप उभारू नयेत, मंडप उभारताना वाहतूक विभाग, पोलीस ठाणे, अग्निशमन विभाग यांची परवानगी घ्यावी, महावितरणकडून रीतसर परवानगी घेऊनच वीजजोड घ्यावे, असे निर्देश दिले आहेत.