‘गांधीजींकडून स्वावलंबनाचा संदेश’
By Admin | Updated: May 21, 2014 00:23 IST2014-05-21T00:23:47+5:302014-05-21T00:23:47+5:30
‘गांधीजींनी लोकांना एकादश व्रते, अस्पृश्यता निवारण, ग्रामसफाई आणि चरख्याच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा संदेश दिला,’

‘गांधीजींकडून स्वावलंबनाचा संदेश’
पिंपरी : ‘‘गांधीजींनी लोकांना एकादश व्रते, अस्पृश्यता निवारण, ग्रामसफाई आणि चरख्याच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा संदेश दिला,’’ असे मत डॉ. महावीर पांढरे यांनी व्यक्त केले. पिंपरी-मोरवाडी म्हाडा सांस्कृतिक मंडळ आयोजित महात्मा गांधी व्याख्यानमालेमध्ये डॉ. पांढरे यांनी महात्मा गांधींचा अहिंसा विचार या विषयावर व्याख्यान दिले. अध्यक्ष बी.आर. माडगूळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पांढरे म्हणाले, गांधीजींसारखा सत्यनिष्ठ, सत्याग्रही आणि अहिंसावादी नेता होऊन गेला. हे भावी पिढ्यांना कपोलकल्पित वाटावे अशा पद्धतीने आज सामाजिक बदल होत आहेत. विविध उपक्रम देऊन कार्यकर्त्यांना संघटित ठेवण्याचे गांधीजींमध्ये सामर्थ्य होते. गांधीजींनी ग्रामीण भागातील लोकांना कमी खर्चात आरोग्य सांभाळण्यासाठी निसर्गोपचार सर्वोत्तम असल्याचे सांगितले.’’ यशवंत आपटे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, अॅड. मनीषा महाजन यांनी जादूटोणाविरोधी कायदा विषयक प्रबोधन केले. आंदोलन, काळ्या पत्रिकेचे प्रकाशन या प्रयत्नानंतर मंजूर झालेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी आता कार्यकर्ते क्रियाशील आहेत. जादूटोणाविरोधी कायद्यामध्ये हिंदू शब्द नाही. हा कायदा सर्व जाती व धर्मातील लोकांसाठी आहे. या कायद्यामुळे देवपूजा करण्यास किंवा देव मानण्यावर बंदी आलेली नाही. यशवंत आपटे, एल. एस. भूमकर, जे. एस. देशपांडे, अरविंद दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)