टोलनाक्यांवरून मुक्तप्रवास! चालकांमध्ये समाधान
By Admin | Updated: November 17, 2016 02:37 IST2016-11-17T02:37:39+5:302016-11-17T02:37:39+5:30
नोटबंदीच्या निर्णयानंतर सध्या टोलनाक्यांवर टोलवसुली बंद असल्याने वाहने विनाअडथळा धावत असून टोलनाक्याजवळ होणारा वाहतूकखोळंबा थांबल्याने चालक समाधान व्यक्त करीत आहेत.

टोलनाक्यांवरून मुक्तप्रवास! चालकांमध्ये समाधान
राजगुरुनगर : नोटबंदीच्या निर्णयानंतर सध्या टोलनाक्यांवर टोलवसुली बंद असल्याने वाहने विनाअडथळा धावत असून टोलनाक्याजवळ होणारा वाहतूकखोळंबा थांबल्याने चालक समाधान व्यक्त करीत आहेत. राजगुरूनगरच्या चांडोली टोलनाक्यावर त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळे चित्र दिसत होते.
येत्या १८ तारखेपर्यंत आम्हाला कुठल्याही वाहनांकडून टोल घेऊ नयेत अशा आमच्या व्यवस्थापनाने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही फक्त कामावर हजर आहोत, पण टोलवसुली बंद आहे, असे आयआरबी कंपनीच्या चांडोली टोलनाक्याचे सहव्यवस्थापक नानासाहेब गायकवाड यांनी सांगितले.
टोलवसुली नसल्याने वाहने या ठिकाणाहून मुक्तपणे जा-ये करीत होती. त्यामुळे टोलनाक्यावर नेहमी दिसणारे वाहने खोळंबल्याचे चित्र सध्या दिसत नाही. टोलनाक्यावरील टोलवसुली करणारी मुले त्यामुळे सक्तीची विश्रांती घेताना दिसत होती. मात्र टोलनाक्यावर थांबून हार, गजरा विकणारे विक्रेते केविलवाणे दिसत होते. ते हातातला हार दाखवून गाड्यांना थांबविण्याचा प्रयत्न करीत होते, पण टोलमुक्तीचा आनंद घेणारे वाहनचालक थांबत नव्हते. नाक्यावर थांबावे लागत नसल्याने आज हायसे वाटत आहे, असे एक वाहनचालक सुदाम थिगळे यांनी सांगितले. टोल भरण्यापेक्षा टोलनाक्यावर होणारी वाहतूककोंडी. कटकटी, वादावादी नको वाटते, असे ते म्हणाले.
टोलनाका सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच विनाटोल जाणारी वाहने मी पाहत आहे. यापूर्वी एकदा मनसेचे आंदोलन झाले तेव्हा एक दिवस काही वेळासाठी टोल बंद होता. मध्यंतरी मराठा मोर्चाच्यावेळी एक दिवस काही वाहनांना सूट होती. पण आताएवढी मुक्त वाहतूक पहिल्यांदाच होत आहे, असे येथे जवळच नर्सरीचा व्यवसाय करणारे राजेश घुमटकर यांनी सांगितले. वाहन खरेदी करतानाच एकरकमी टोल घेतला गेला तर हि रोजची अडवणूक कमी होऊ शकेल अशी प्रतिक्रिया एका वाहनचालकाने व्यक्त केली. (वार्ताहर)